मिलिंद माने
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायवाटेवर महादरवाजा ते वाळसुरे खिंड दरम्यान मातीचा भराव रस्त्यावर आल्याने रायगडावर जाण्याचा मार्ग काही काळ ठप्प झाला होता. दरड हटवल्याने पुन्हा पायी मार्ग चालू झाल्याने पर्यटकांनी रायगडावर पायी जाण्याचा आनंद घेतला.

पावसाळ्यात किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असल्याने दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटनेमुळे अनेक वेळा रायगड किल्ल्याकडे जाणारा पायी मार्ग बंद करावा लागतो. यावर्षी देखील पावसाळा चालू झाल्याने त्यातच शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने रायगडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. महाड तालुक्यात व किल्ले रायगड परिसरात मागील दोन दिवसापासून दुर्गम व डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे डोंगरावरील धबधबे ओसंडून वाहत असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी करीत आहेत.

किल्ले रायगडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे पायी मार्गावर दरड कोसळून पायीमार्ग काही काळासाठी बंद होण्याच्या घटना दरवर्षी पावसाळ्यात घडत असतात. तसाच प्रकार चालू वर्षी देखील पहिल्याच पावसात जून महिन्याच्या शेवटच्या रविवारी घडला. किल्ले रायगडावरील महादरवाजा आणि वाळसुरे खिंड दरम्यान असलेल्या पायवाटेवर मातीचा भरावा आल्याने काही काळासाठी किल्ले रायगडावर जाणारी पाऊलवाट बंद झाली होती. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, या ठिकाणी आलेला मातीचा भराव बाजूला करण्यात आल्याने किल्ले रायगडावर जाणाऱ्या व येणाऱ्या पर्यटकांना थोड्या वेळातच दिलासा मिळाला, असे असले तरी रायगडावर चालू असलेल्या रायगड प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीचे दगड पडण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे ऐन पावसाळ्यात या भिंती कोसळण्याची शक्यता देखील पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.