• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड शहरात गटार सफाई कागदावर…पाणी रस्त्यावर!

ByEditor

Jun 30, 2024

साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास

मिलिंद माने
महाड :
महाड शहरातील गटार आणि नाले स्वच्छता पावसाळ्याच्या तोंडावर केल्याचे भासवले. शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारातील पाणी थेट रस्त्यावर येऊन तुंबत आहे. यामुळे गटार आणि नालेसफाई फक्त कागदावरच केली का असा प्रश्न नागरिकांना पडला असून गटारीतील पाणी रस्त्यावर आल्याने रोगराईची शक्यता निर्माण झाली आहे.

महाड शहरात पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारे आणि नाले सफाई होणे आवश्यक असते. महाड नगरपरिषदेच्या या कामासाठी ठेका देण्यात आला असून शहरातील नाले आणि गटारे पावसाळ्याच्या तोंडावर सफाई करण्याची काम हाती घेण्यात आले होते. काही ठिकाणी गटार आणि नाले स्वच्छता केल्याचे भासवले मात्र, अनेक ठिकाणी आजही गटारे कचरा आणि प्लास्टिक पिशव्या व मातीने भरलेली आहेत यामुळे नाल्यातील आणि गटातील पाणी थेट रस्त्यावर येऊन थांबत आहे.

महाड शहरात रस्त्यावर जमलेल्या पाण्यामुळे नागरिकांना तसेच दुचाकीस्वारांना त्रास होत आहे. रस्त्यावरील पाणी गटारामध्ये जाण्याकरता जेसीबी यंत्राद्वारे मार्ग काढून दिला असला तरी गटारातील पाणी मोठ्या नाल्यांना मिळत नसल्याने हे पाणी पुन्हा रस्त्यावर येऊन थांबत आहे. महाड नगरपालिकेकडून करण्यात आलेली ही गटार आणि नाले सफाई कागदावरच केली गेली का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

महाड या ऐतिहासिक शहरांमध्ये अनेक वर्षांपूर्वी काही भागांमध्ये भूमिगत नाल्यांची व्यवस्था होती. यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊन थेट नदीला पाणी मिळत होते. मात्र बदलत्या काळामध्ये फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून पैसा खर्च करण्याच्या प्रयत्नात केली जाणारी गटारे ही तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने गटारातील पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे अभियांत्रिकी विभागाचा कारभार ऐन पावसाळ्यात कायम चव्हाट्यावर येतो. या पावसाळ्यात देखील अशीच अवस्था महाड शहरात विविध रस्त्यांवर झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक ते काकरतळे गणेश मंदिर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. या रस्त्यावर बँक ऑफ इंडियाची शाखा असल्याने वयोवृद्ध नागरिकांना याच पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. अशीच अवस्था चवदार तळ्याच्या चहुबाजूने झाली आहे. चवदार तळ्याच्या मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूला गटार सफाई झालेली नसल्याने आणि येथील पाणी दुसऱ्या मोठ्या गटाराला मिळत नसल्याने रस्त्यावरच पाणी तुंबले आहे. महाड शहरात येणाऱ्या दादली पुलाजवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गेट जवळील देखील मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत असल्याने त्यातून महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर देखील अशीच अवस्था पहावयास मिळत आहे.

महाड शहरात मागील दोन ते तीन वर्षांपासून दादली पुलाजवळ रस्त्यावरच पाणी तुंबले जात असल्याने या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. गटार आणि नालेसफाईवर महाड नगरपालिकेकडून कायम खर्च केला जात आहे मात्र हा खर्च पूर्णतः वाया जात असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदार पावसाळ्यापूर्वी केली जाणारी कामे ही पावसाळ्याच्या तोंडावर करत असल्याने अशी अवस्था निर्माण होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या तुंबलेल्या गटारामुळे ऐन पूर परिस्थितीत शहरात आलेले पुराचे पाणी निचरा होण्यास वेळ लागत आहे. यामुळे नागरिकांना किमान दोन दिवस तरी पुरा च्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो.

महाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने याबाबत त्वरित लक्ष घालून साचलेल्या पाण्यासाठी मार्ग काढून दिला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत असली तरी नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याने सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे काम होत नसल्याने सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!