• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यात १४ म्हैशी, ५ गाईंसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त; नागोठणे पोलिसांची गुरे चोरणाऱ्यांवर कारवाई

ByEditor

Jun 30, 2024

नागोठणे पोलिसांच्या दोन दिवसात दोन कारवाया

महेंद्र म्हात्रे
नागोठणे :
जिल्ह्यात गुरे चोरणाऱ्या टोळ्यांनी हैदोस मांडला आहे. रात्रीच्या अंधारात या टोळ्या गुरे चोरून नेत आहेत. मागील पंधरा दिवसात जिल्ह्यातील विविध भागात गुरे चोरीच्या घटना घडल्या आहेत. नागोठणे पोलिसांनी दोन दिवसात दोन वाहनांवर कारवाई करीत जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांसह एक आयशर टेम्पो, एक पिकअप जीप, चोरीच्या १४ म्हैशी, ५ गाईंसह एक बैल जप्त केला आहे.

२८ जून रोजी रात्री मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे जवळील कामत हाॅटेलजवळ संदीप महिपाल पाल (वय 41, रा. कर्चलपूर पो. बिजावली ता. औंध, जि. फतेपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. रेल्वेस्टेशन जवळ विरार जि. ठाणे) हा पिकअप जीप क्र. एमएच 48 सीक्यु 3203 मध्ये 5 गाय व 1 वासरू दाटीवाटीने भरून त्यांना कोणताही चारा अगर पाणी व्यवस्था न करता निर्दयी व क्रुरपणे वाहतूक करीत होता. त्यातील एक गाय पडून तीचे पायाला दुखापत झाली. यावेळी नागोठण्यातील काही दक्ष नागरिकांनी या वाहनचालकाला अडवून पोलिसांना याबाबत माहिती दिली. नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह नागोठणे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी सदर इसमास ताब्यात घेऊन पिकअपसह ५ गाई व एक वासरू जप्त केले. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हि घटना ताजी असतानाच शनिवार, दि. २९ जून रोजी मध्यरात्री नागोठणे मिरानगर जवळ आरोपीत अक्रम अब्दुलगनी सयद (वय 42, रा. रमन मामा नगर बैगनवाडी, गोवंडी, मुंबई) हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो क्र. एम एच 03 ईव्ही 5284 मध्ये 14 म्हशी दाटीवाटीने भरून त्यांना कोणताही चारा अगर पाणी याची व्यवस्था न करता निर्दयी व क्रुरपणे आयशर टेम्पोमधून वाहतुक करीत असताना नागोठणे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही घटनांचा पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. व्ही. लांगी करीत आहेत. या दोन घटनांमध्ये २०,९५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गुरे चोरण्याचा टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे काही दिवसात घडलेल्या विविध घटनांमधून समोर आले आहे. मात्र, यासाठी संबंधित शेतकरी देखील तेवढेच जबाबदार आहेत. बहुतांश शेतकरी आपल्या गुरांचा वापर कामापूरता करतात व काम झालं की त्यांना मोकाट सोडून देतात. यामुळे पाळत ठेऊन असलेल्या गुरे चोरणाऱ्या टोळीला गुरे चोरणे सोपे होऊन जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपली गुरे मोकाट न सोडता व्यवस्थित गोठ्यात बांधून ठेवली तर गुरे चोरीला आळा बसेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!