• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

स्वराज्य आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रेंना २९५व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ByEditor

Jul 4, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या २९५व्या पुण्यतिथीनिमित्त ४ जुलैला अलिबाग येथे भारतीय नौसेना, जिल्हा प्रशासन व रायगड पोलिस व अलिबाग नगरपरिषद यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै या गावचे सुपुत्र असलेल्या कान्होजी आंग्रे यांनी सुरत ते गोवा या सागरी किनारपट्टीवर स्वराज्याचा भगवा फडकवला. इंग्रज, पोर्जुगीज, डच आणि फ्रेंच या परकीय आक्रमकांचे किनारपट्टीवरील वर्चस्व मोडित काढले. त्यांच्या अतुलनीय साहसाचे स्मरण व्हावे म्हणून भारतीय नौदलाने आपल्या पश्चिम विभागाला आयएनएस आंग्रे असे नाव दिले. दरवर्षी कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीला अलिबाग येथील त्यांच्या समाधीस्थळावर भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रे विभागातील अधिकारी शासकीय इतमामात अभिवादन करण्यासाठी येतात.

समुद्रावरचा छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनाऱ्याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता. १७०७ मध्ये मराठेशाहीमध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला. कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.

सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सागरी भागात मुक्तपणे संचार करणाऱ्या परकियांवर निर्बंध आणले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले. सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले. तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले. शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.

पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनाऱ्यावर एक दबदबा निर्माण केला होता. कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठी पण होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह, पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते. कोकण किनारपट्टीवर राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला. यावर्षी कान्होजीराजे आंग्रे यांच्या २९५व्या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग येथील मुख्य कार्यक्रमाला कमांडंट ऋषी कोहली, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी उपस्थित होते.

कमांडर ऋषी कोहली यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, नौसेना, कमांडंट ऋषी कोहली, माजी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल चोपडा, संजना कीर, अजय झुंजारराव, अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे आदी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!