• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माझी लाडकी बहिण ‘तात्याचे’ कार्यालय शोधते!

ByEditor

Jul 5, 2024

चक्रीवादळात छप्पर उडाल्याने तलाठी कार्यालय आजही भाड्याच्या खोलीत

सलीम शेख
माणगाव :
नागरिक व शासन यांच्यातील समन्वय घडविणारा महसूल खात्याची सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे तलाठी. या तलाठ्यांना नागरिकही आपल्याच कुटुंबातील सदस्य म्हणून आदराने ‘तात्या’ म्हणून संबोधतात. नैसर्गिक आपत्ती असो की, जमिनीचे कोणतेही कागद असो यांच्याशिवाय शासन दरबारी नोंद होत नाही. चार वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला इतंभूत माहिती पुरवून आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे अनेकांच्या घरावरील उडालेली छपरे उभारली गेली. मात्र, चार वर्षांपूर्वी चक्रीवादळात उडालेले इंदापूर येथील तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयाच्या छप्पराची दुरुस्ती केली नसल्याने तलाठी ‘तात्याचे’ कार्यालय भाड्याच्याच खोलीत सुरु असून हे कार्यालय शोधताना लाडक्या बहिणींची चांगलीच दमछाक होत आहे.

माणगाव तालुक्यातील तळाशेत-इंदापूर येथील ऐतिहासिक कालीन दगडाच्या बांधकामात असणारी जुनी इमारत बस स्थानकाच्या पाठीमागे शेकडो वर्षांपासून उभी आहे. या ठिकाणी पूर्वी इंदापूर पोलीस दूरक्षेत्र चालत होते. या इमारतीच्या पटांगणात दोन तोफा आजही उभ्या आहेत. त्यामुळे हि वास्तू इतिहासाची साक्ष देत असून याच इमारतीत महसूल गोळा केला जात होता. त्यामुळे पोलीस चौकी व महसूल हि दोन्ही खाती इंग्रज सरकारच्या काळापासून असावीत अशी नागरिकात चर्चा आहे. या इमारतीतील पोलीस दूरक्षेत्र इंदापूर येथील दुसऱ्या जागेत ८ वर्षांपूर्वी स्थलांतरीत केल्याने तेथे महसूल खात्याची मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालये सुरु होती. चक्रीवादळात या कर्यालयावरचे छप्पर उडून गेल्याने चार वर्षात शासनाला छप्पर बसाविण्यासाठी निधी देता आला नाही.

सध्या चार वर्षांपासून मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय हे भाड्याच्या खोलीत सुरु असून इंदापूर बाजारपेठेपासून ते दूर अंतरावर आहे. तसेच ते ग्रामीण भागातून कामे घेवून येणाऱ्या नागरिकांना शोधून सहजासहजी सापडत नाही. तलाठी कार्यालय एका बाजूला तर तेथून दूर अंतरावर मंडळ कार्यालय असल्याने नागरिकांना ते सोयीचे नाही. त्यामुळे दोन्ही कार्यालयाकडे पायपीट करावी लागते. सध्या ‘माझी बहिण लाडकी’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना स्थानिक पातळीवरील कागदपत्रे मिळविण्यासाठी मंडळ व तलाठी कार्यालयाचा शोध घ्यावा लागत आहे. पंचक्रोशीतील भुवन, रातवड, तळाशेत, पोटणेर, पानसई, मुठवली तसेच या परिसरातील ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावे, वाड्यातील नागरिकांना तलाठी कार्यालयात विविध कामासाठी यावे लागते. परंतु निसर्ग चक्रीवादळामुळे तलाठी कार्यालयाचे पत्र्याचे छप्पर उडाले. परंतु जनतेला छप्पर ज्या कार्यालयाकडून मिळाले तेच तलाठी कार्यालय आजतागायत छप्पराविना उभे आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!