मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दासगाव, नडगाव व केम्बुर्ली खिंडीतील धोकादायक स्थिती दुर करण्याचा प्रयत्न
मिलिंद माने
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्यात महाड तालुक्यातील दासगाव खिंड, केंबुर्ली आणि नडगाव या तीन ठिकाणी असणाऱ्या डोंगरावरून रस्त्यावर दरडी कोसळण्याची भीती निर्माण झाली असल्याने त्यातच पावसाळा सुरू झाल्याने काही ठोस उपाय योजना करता येत नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात एल अँड टी कंपनीमार्फत दासगाव, नडगाव व केभुर्ली येथील खिंडीत धोकादायक स्थिती दूर करण्याचा प्रयत्न चालू करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आजही अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. ज्या ठिकाणी महामार्गालगत डोंगरभागाशेजारी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले, त्या ठिकाणी पावसाळा सुरू होताच रस्त्यावर वाहतूक चालू असताना दिवसा व रात्री दरडी येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महाड तालुक्यात नडगाव, केंबुर्ली आणि दासगाव या तीन ठिकाणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण करते वेळी ही धोकादायक स्थिती उद्भवणार आहे. याचा विचार करणे गरजेचे होते मात्र, या मुजोर एल अँड टी कंपनीवरवर रायगड जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचा वचक नसल्याने व शासनाचा देखील लगाम नसल्याने त्यांनी मनमानी पद्धतीने व घाईगडबडीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या रस्त्यांची व भुयारी मार्ग ही कामे पूर्ण केली. मात्र, त्याचा फटका या पावसाळ्यात या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना तसेच प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना नक्कीच बसणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील दासगाव खिंडीत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. कधीही डोंगर भागातून झाडे आणि दगड माती महामार्गावर येण्याची शक्यता असल्याने आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहता गुरुवारी तात्पुरत्या स्वरूपात धोकादायक स्थिती दुर करण्यासाठी या मार्गाचे काम केलेल्या एल अँड टी कंपनीने महामार्गाची वाहतूक एकेरी मार्गाने सुरू करून या ठिकाणी काही प्रमाणात वृक्षांची तोड करत ज्या धोकादायक स्थितीत दगडी होत्या त्या काढून डोंगराच्या वरच्या बाजूस कापडी नेट बांधले असून त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या ठिकाणी पावसाळ्यात कधीही दरड कोसळण्याचा धोका आजही कायम आहे. या धोकादायक स्थितीला जबाबदार कोण? असा सवाल दासगाव गावातील ग्रामस्थ व या महामार्गावरून प्रवास करणारे असंख्य वाहनचालक महाड येथील राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या मुजोर अधिकाऱ्यांना विचारीत आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणानंतर पहिल्याच पावसात दासगाव खिंडीमध्ये तसेच केभुर्ली येथील खिंडीत व नडगाव येथील खिंडीत धोकादायक स्थिती निर्माण झाली असून याला जबाबदार कोण? एल अँड टी कंपनी की महाड येथील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे मुजोर अधिकारी व मुजोर शाखा अभियंता हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे.
दासगाव येथील खिंडीमध्ये दोन्ही बाजूने गावासाठी सर्विस रोड आहे. खिंडीचे रुंदीकरण ज्यावेळेस केले त्यावेळी एल अँड टी कंपनी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जेवढी परवानगी वनखात्याकडून मिळाली तेवढे काम पूर्ण केले आहे. त्या ठिकाणी वनखात्याने दिलेल्या माहितीनुसार इंदापूर ते धामणदेवीपर्यंत मागितल्याप्रमाणे सर्व परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. मग या खिंडीचे काम अर्धवट का राहिले? आज प्रवाशांचे जीव नक्कीच धोक्यात आले याला जबाबदार कोण? असा सवाल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून दररोज वाहतूक करणारे वाहनचालक व दासगाव गावातील सर्वसामान्य जनता राष्ट्रीय महामार्ग खात्यातील, जिल्ह्यातील व कोकणातील सर्वपक्षीय राजकीय पुढार्यांना विचारीत आहे.
दासगाव खिंडीमध्ये धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर येणारी झाडे व दगडी काढून धोकादायक स्थिती दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती हरिहर नायक नामक एल अँड टी कंपनीचे सुरक्षा अधिकारी (safty oficer) यांनी दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील इंदापूर ते धामणदेवी या पट्ट्यातील वनखात्याच्या जमिनीबाबत जेवढ्या परवानग्या मागितल्या त्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत असे महाड येथील वन खात्याचे वनक्षेत्रपाल आर. बी. शाहू यांनी सांगितले.
एकंदरीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील धोकादायक डोंगरावरील दरडी कोसळून अनेकांचे बळी जाण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व एल अँड टी कंपनी बघत होती का? असा सवाल या निमित्ताने महामार्गावरील प्रवाशांकडून वाहने थांबून एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला जात आहे.