काळ नदीच्या पाण्याची पातळी वाढली
सलीम शेख
माणगाव : तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. माणगाव शहरातुन वाहणाऱ्या काळनदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदी काठच्या लोकांना व जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

तालुक्यात गेले दोन दिवस रात्रंदिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. त्यातच शेतकऱ्यांची लावणीची कामे सुरु असल्याने बाजारपेठ ओस पडत असून दुकानदारांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे माणगाव शहरातून वाहणाऱ्या काळ नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत असून शहरातील काही शाळा-महाविद्यालयाच्या परिसराला पाण्याचा वेढा चोहोबाजूनी पडला आहे. टिकमभाई मेथा महाविद्यालय परिसरात सोमवारी सकाळपासूनच पाण्याचा वेढा पडल्याने महाविद्यालयात त्यादिवशी आलेल्या विद्यार्थ्यांना घरी परत जावे लागले. या मुसळधार पावसामूळे तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा माणगाव शहराकडे येण्याचा संपर्क तुटला आहे. हा मुसळधार पाऊस असाच आणखीन दोन दिवस पुढे सुरु राहिल्यास काळनदी धोक्याची पातळी ओलांडेल असे वाटत असल्याने नदी काठच्या लोकांना व जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.