• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड-रायगड रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील लाडवली पुल पूर्ण होण्यास लागणार दोन महिन्याचा कालावधी?

ByEditor

Jul 8, 2024

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एसटी बसेस बंद; शालेय विद्यार्थ्यांचे हाल

मिलिंद माने
महाड :
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड परिसराकडे जाणाऱ्या महाड-रायगड रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. या मार्गावरील अनेक पूलांचे काम अर्धवट अवस्थेत आहे. महाड जवळील लाडवली गावाजवळ असलेला नव्याने उभा राहत असलेल्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने पर्यायी मार्गावरून सातत्याने पुराचे पाणी जात आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. एसटी महामंडळाने या परिसरातील एसटी बसेस फेऱ्या बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या पुलाची सद्यस्थिती पाहता पुलाच्या कामाला आणखी दोन महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाड तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नव्याने उभा राहत असलेल्या पुलाच्या कामात कामात व्यत्यय येत आहे. यामुळे हे काम पूर्ण होण्यास किमान दोन महिने वाट पहावी लागणार आहे. पुलाच्या कामाला जर दोन महिने लागत असतील तर या काळात या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसेस फेऱ्या बंद राहणार का? असा सवाल रायगड परिसरातील 25 गावातील विद्यार्थ्यांच्या पालक वर्गाने केला आहे. महाड येथील राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे महाड रायगड आणि म्हाप्रळ-पंढरपूर या दोन्ही मार्गांचे काम गेली चार वर्षांपासून रखडले आहे. महाड-रायगड तसेच खाडीपट्ट्यातील नागरिकांचे यामुळे हाल झाले आहेत.

महाड तालुक्यात मागील काही दिवस किल्ले रायगड परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे मांडला नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. त्यातच लाडवली पुलाजवळील नवीन पुलाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या पर्यायी मार्गावरून पुराचे पाणी जात आहे. पुराच्या पाण्यामुळे महाड-रायगड मार्ग बंद ठेवला जात आहे. रायगड मार्गावरील तेटघर, आचलोली, नाते, खर्डी, कोंझर, पाचाड, सांदोशी अशा विविध गावातील अनेक तरुण महाड औद्योगिक क्षेत्रात तसेच मोलमजुरी करणारे कामगार, महिला आणि विद्यार्थी महाडमध्ये येत असतात. हा मार्ग पाण्याखाली जात असल्याने एसटी महामंडळाने या परिसरातील एसटी बसेस फेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना, मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना महाडकडे पायी चालत यावे लागत आहे.

किल्ले रायगड परिसरातील कोंझर गावातील हायस्कूलमध्ये पाचाड, रायगड वाडी, हिरकणी वाडी, वाळसुरे, खर्डी, चापगाव आदी गावातील विद्यार्थी येतात. शाळेत येण्यासाठी एसटी हा एकमेव प्रवासाचा पर्याय विद्यार्थ्यांकडे आहे. मात्र, एसटी बसेसच्या फेऱ्या बंद केल्याने त्यांचे हाल झाले आहेत. पाचाड, रायगड वाडी, हिरकणी वाडी, पाचाड गाव, वाळसुरे, खर्डीपासूनच्या विद्यार्थ्यांना कोंझर येथे किमान दहा किमीचा प्रवास पायी करावा लागत आहे. महाड शहर आणि परिसरातील एकंदरीत परिस्थिती पाहता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणी वाली आहे का? असा प्रश्न देखील नागरिकांकडून विचारला जात आहे. लाडवली येथे पर्यायी मार्गावरून सातत्याने पुराचे पाणी जात असल्याने आणि पर्यायी मार्गावरून एसटी बस जाणे शक्य नसल्याने या मार्गावरील एसटी बसेस फेऱ्या बंद केल्या असल्याचे महाड आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांनी सांगितले.

एकंदरीत लाडवली येथील पुलाच्या अर्धवट अवस्थेतील कामामुळे या मार्गावरील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली असताना राष्ट्रीय महामार्ग खात्यासहित जिल्हा प्रशासन देखील एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहे. त्यामुळे दाद कोणी कोणाकडे मागायची असा प्रश्न रायगड परिसरातल्या 25 गावातील जनतेला पडला आहे. आता निवडणुका जवळ आल्यावर या पुलाचे उद्घाटन करण्यास मात्र ज्या पद्धतीने पुढारी व सत्ताधारी आमच्यामुळेच हा पुल झाला असे तोरा मिरवतील त्यांना मात्र पावसाळ्यातील शालेय विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल याकडे लक्ष देण्यास मात्र वेळ नसल्याचे यावरून दिसत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!