किल्ले रायगडावर आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज
पर्यटकांना महिनाभर रायगड दर्शन बंद
मिलिंद माने
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साचवून ठेवण्यासारखे आहे. धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. झाडांवरही निसर्गसौंदर्याचा वेगळाच रंग दिसून येत आहे. पावसाळ्यात पिकनिकची मजा घेण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी रायगडावर येतात, मात्र काल झालेल्या ढगफुटीमुळे पुन्हा एकदा रायगडावर पावसाळ्यात आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. तब्बल एक महिना रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे महाडच्या प्रांताधिकार्यांनी पाठविला आहे.
किल्ले रायगडवर मनमुराद आनंद घेण्यासाठी सुट्टीच्या दिवसात हजारो पर्यटक देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून रायगडाकडे वळले आहेत. मात्र, रविवारी दुपारनंतर गडावर झालेल्या मुसळधार पावसामुळे व ढगफुटीने पर्यटकांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र रायगडावर पाहावयास मिळाले. रायगड परिसरामध्ये आणि किल्ले रायगडावरील निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पर्यटक देशासहित राज्याच्या कानाकोपऱ्यातून रायगडावर दाखल होत असतात. रविवार व सलग लागून आलेल्या सुट्टीच्या दिवसात रायगडावर हजारो पर्यटकांची गर्दी होते.
किल्ले रायगडावरती रविवारी दुपारपर्यंत वातावरण सामान्य असताना दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला व मुसळधार पाऊस चालू झाला व त्याचे रूपांतर गडावर ढगफुटीमध्ये झाले. त्यामुळे किल्ले रायगड येथे पर्यटनासाठी आलेल्या हजारो पर्यटकांना काही सुचेनासे झाले. पर्यटकांची एकच तारांबळ उडाली. काही पर्यटकांनी रोप वेने पुन्हा खाली येण्यासाठी तर काही पर्यटकांनी पायरी मार्गे येण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र, वारा आणि पाऊस असल्याने रोप वे देखील काही काळ बंद ठेवण्यात आला. यामुळे अनेकांनी पायरी मार्गाने गड उतरण्यास सुरुवात केली. मात्र, किल्ल्यावरील वारा व व पावसाचे रौद्ररूप पाहता काही क्षणातच महादरवाजा आणि इतर ठिकाणी असलेल्या पाण्याच्या प्रवाहाने धबधब्याचे रूप धारण केले. पायऱ्यांवर देखील धबधबा तयार झाला. यामुळे पर्यटकांनी पायऱ्यांच्या कडेला असलेल्या तटबंदीचा आधार घेत स्वतःचा जीव कसाबसा वाचविण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरती या ढगफुटीमुळे परिसरातून वाहणारी गांधारी, काळ, महाड परिसरातील सावित्री या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या. सायंकाळी महाडमध्ये देखील पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली होती. काळ नदीने रौद्र रूप धारण केल्याने बिरवाडी जकात नाका रस्त्यावर पुराचे पाणी आले. हीच स्थिती रायगड रस्त्याबाबत झाल्याने हा रस्ता देखील बंद ठेवण्यात आला होता.
रायगड रस्त्यावर पाचाडजवळ ठिकठिकाणी अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बेजबाबदार धोरणामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर मातीचा भराव आला होता, मात्र त्याकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाडच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अनेक ग्रामस्थांना या चिखलातूनच मार्ग काढावा लागत होता. तसेच हिरकणी वाडी ते नेवाळी, सांदोशी रस्ता आणि इतर रस्त्यांवर देखील मातीचा भराव आला. मात्र या कामाकडे देखील रायगड प्राधिकरणाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणी येथील ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागला.
धबधब्यावर गेलेला तरुण वाहून गेला
किल्ले रायगडावर ढगफुटी झाल्याने रायगडावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले होते. याच दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगड वाडी गावातील एक तरुण आपल्या मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यास गेला होता. अचानक पाणी वाढल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि या रौद्ररूप धारण केलेल्या पाण्यामध्ये रायगड वाडी गावातील मनोज खोपकर हा तरुण वाहून गेला. तो मुंबईवरून आपल्या मित्रांसह गावी आला होता. दुसऱ्या दिवशी एनडीआरएफच्या पथकाने तसेच स्थानिक तरुणांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप तो मिळून आलेला नाही.
किल्ले रायगड महिनाभरासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव
किल्ले रायगड आणि परिसरामध्ये गेली अनेक पिढ्या मुसळधार पाऊस पडत आहे. यापूर्वी जून महिना सुरू झाल्यानंतर गडावर पावसाळ्याचे चार महिन्यात कोणीही फिरकत नव्हते. मात्र सोशल मीडियाचा काळ असल्याने आणि रायगडाकडे वाहतुकीची झालेली सुविधा यामुळे गडावर पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. ऐन पावसाळ्यात गडावर पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. मात्र, या परिसरात क्षणात बदलणारे हवामानामुळे नेहमीच ढगफुटी सदृश्य पाऊस होतो किंवा गडावरून दगडी कोसळण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. रविवारी झालेल्या ढगफुटीनंतर पुढील दोन दिवस किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. मात्र संपूर्ण जुलै महिना अतिवृष्टीचा असल्याने रायगड किल्ला संपूर्ण महिना बंद ठेवण्यात यावा अशा प्रकारचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले.
एकंदरीत रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असून या किल्ल्यावर देशासहित राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक येत असतात. मात्र, पावसाळ्यात क्षणार्धात बदलणाऱ्या हवामानाचा पूर्वा अंदाज देण्यासाठी राज्य सरकारने व केंद्रीय यंत्रणेने आपत्कालीन परिस्थिती सारखी यंत्रणा रायगडावर उभारणे गरजेचे असल्याचे किल्ले रायगडावरील अनेक पर्यटकांनी बोलून दाखवले.