प्रतिनिधी
नागोठणे : देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष उलटून गेली तरीही आज देशासहित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गरीब वंचित कुटुंब आहेत जी शिक्षणापासून आर्थिक अडचणीमुळे वंचित राहतात, मात्र महाराष्ट्र हे असे एक राज्य आहे जिथे अनेक सामजिक संघटना, संस्था मदतीला धावून जातात. अशाच प्रकारे तेज सोशल फाऊंडेशन मुंबई यांनीही आपला खारीचा वाटा उचलत रायगड जिल्ह्यातील श्री गणेशनाथ महाराज विद्यामंदिर पाबळ, रा. जि. प. शाळा कार्ला, धायरवाडी वरप व गंगेचीवाडी या आदिवासी पाड्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दि. ६ जुलै रोजी वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गायकवाड, सचिव जयश्री गायकवाड, खजिनदार व पत्रकार तेजश्री गायकवाड, प्रमुख पाहुणे राजश्री कदम, उद्योजक दर्शन कदम उपस्थित होते. सदर कार्यक्रमास दिशा सामाजिक संस्था, श्री अंबिका योग कुटीर वडाळा शाखा, अभियंता शिवाजी भोसले, कनिष्ठ अभियंता श्री. जगताप, श्री. व्यंकट, श्री. रामगुडे, विश्वास तुपे व वरप सरपंच गणेश मनवे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे प्रवीण पाटील, कदम सर व अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोलाचे सहकार्य केले.