वृत्तसंस्था
मुंबई : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरण्यात आले असून तब्बल २० वर्षे रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, असा दावा रस्ते बांधकाम कंपनी एमएसआरडीसीने केला होता. मात्र, हा दावा एका वर्षातच खोटा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. यातच महामार्गावर पडलेल्या भेगा आणि खड्यांमुळे अपघाताच्या घटनेत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, प्रशासनाने अद्यापही कोणती दखल घेतली नसल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. समृद्धी महामार्ग अद्याप मुंबईपर्यंत सुरूदेखील झाला नाही आणि वर्षभरातच अशी दुरवस्था झाली आहे तर, पुढे काय होणार असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
वर्षभरातच रस्त्याची दुरावस्था
मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किलोमीटरचा आहे. यापैकी आतापर्यंत ६२५ किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यावेळी एमएसआरडीसीने मोठा गाजावाजा करीत हा रास्ता चांगल्या पद्धतीने बनवण्यात आल्याचा दावा केला होता. परंतु, पहिल्याच पावसात समृद्धी महामार्गावर अशी दुरवस्था झाल्याने वाहनचालकांनी डोक्यावर हात मारला.
समृद्धी महामार्गावरून विरोधकांनी सरकारला घेरले
समृद्धी मार्गाच्या प्रोजेक्टमध्ये शासनाचे २० हजार कोटी रुपये अतिरिक्त काढले गेले. यातून काही मंत्री आाणि अधिकाऱ्यांना लाभ झाला, असा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा मृत्युचा सापळा बनला आहे, जिथे रोज लोकांचे जीव जात आहेत. समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. परंतु, या सरकारला त्याची काळजी नाही. हे सरकार निर्लज्ज सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.