अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या तळमळीने निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी मांडवा येथे रविवार, दि. ३० जून रोजी वृक्षारोपण केले तर आवास, सुरेखार येथे रविवार, दि. ७ जुलै रोजी असे एकूण तब्बल १५० देशी जातींच्या झाडांचे वृक्षारोपण केले.

या दोन्ही वेळी सर्व कार्यकर्ते आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून वृक्षरोपणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी वृक्षारोपण करताना देशी जातीच्या पिंपळ, बहावा, कांचन, करंज, कदंब आदी प्रकारची झाडे लावली. या चळवळीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी एकच संदेश दिला आहे की, वाढत असणारे कार्बन उत्सर्जन जर नियंत्रित करायचे असेल तर वृक्षरोपण करणे ही खरच काळाची खूप मोठी गरज बनली आहे, कारण तापमान वाढीचे मुख्य कारण म्हणजे कार्बनडायऑक्साईडचे वाढते प्रमाण आहे. तसेच नुसती झाडे लावून नाही तर असलेली जी झाडे आहेत ती सुद्धा टिकवून ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे, तर आणि तरच आपण कार्बन उत्सर्जन नियंत्रित करू शकतो. या समूहातर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्वांनी वृक्षहीन डोंगर, टेकड्या, भाट, मोकळ्या जागा असतील तिथे वृक्ष लावले पाहिजेत. जागेनूसार झाडांची निवड करावी आणि त्याप्रमाणे डोंगर टेकड्या इथे वड, पिंपळ अशी झाडे लावली तर अति उत्तमच. भविष्यामध्ये सुद्धा या समूहाचे काम असेच चालू राहणार अशी ग्वाही समूहाच्या सर्व सदस्यांनी दिली आहे. “चला मग आम्ही एक पाऊल निसर्गाच्या संरक्षणासाठी उचलले आहे तुम्ही कधी उचलताय?” असे आवाहन समूहाच्या सदस्यांनी केले आहे.