• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड-रायगड रस्ता 18 तास बंद; प्रशासन सुस्तच!

ByEditor

Jul 13, 2024

लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावर पाणी आल्याने रस्ता बंद

मिलिंद माने
महाड :
महाड-रायगड रोडवरील लाडवली गावाजवळील नव्याने उभ्या राहत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावर पाणी आल्याने पर्यायी मार्ग सलग अठरा तास बंद असून देखील प्रशासनाने यावर कोणतीच उपाय योजना न केल्याने 25 गावांचा संपर्क तुटला असताना देखील राष्ट्रीय महामार्ग खाते झोपी गेल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही वेळी रायगड रोडवर आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाड-रायगड रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. जागोजागी अर्धवट अवस्थेत ठेवलेल्या या कामामुळे आधीच रायगडकडे जाणाऱ्या 25 गावातील ग्रामस्थांना दररोज खड्ड्यातून व अपघातांचा सामना करीत अंतर पार करावे लागत आहे. त्यातच लाडवली जवळील मांडले नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र, रायगड खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघता हा पर्यायी रस्ता पर्जन्यवृष्टी झाल्यास मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाणी साचून हा रस्ता बंद झाल्याच्या घटना पावसाळा चालू झाल्यानंतर किमान आजपर्यंत सहा ते सात वेळा घडल्या आहेत.

महाड तालुक्यात मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून चालू झालेल्या पावसामुळे लाडवली येथील पर्यायी मार्गावर शुक्रवारी दुपारपासूनच पाणी साठल्याने हा महामार्ग बंद झाला आहे. आज या घटनेला 18 तासाहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकाऱ्याने व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्थेबाबत ग्रामस्थांशी व स्थानिक नागरिकांची चर्चा केली नसल्याने या पाण्यातूनच धोकादायक परिस्थितीमध्ये काही लोक मार्गक्रमण करीत आहेत.

महाड तालुक्यात कालपर्यंत 120 मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर एकूण पाऊस अकराशे मिलिमीटरपर्यंत आत्तापर्यंत पडला आहे. शुक्रवारपासून चालू झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठल्याने पुर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर सलग अठरा तास छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडकडे जाणारा रस्ता बंद असतानाही प्रशासन मात्र झोपी गेली आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले असून राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात शिव्यांची लाखोली वाहत आहेत. ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी या ठिकाणी तोंड देखील दाखवत नसल्याने 25 गावातील नागरिकांचा तब्बल 18 तास संपर्क तुटला आहे.

महाड जवळील लाडवली येथील पर्यायी पुलाच्या जागी असणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यास त्या ठिकाणची वाहतूक दोन्ही बाजूकडून बंद करण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित नसल्याने पाण्याच्या प्रवाहात एखादे वाहन जाऊन दुर्घटना घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खाते व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला जाग येणार का? असा सवाल रायगड परिसरातील 25 गावातील जनता राज्य सरकारला व राष्ट्रीय महामार्ग खात्याचा प्रशासनाला विचारत आहे. मात्र अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर व कन्स्ट्रक्शन कंपनीवर शासन कारवाई करणार की नागरिकांना पुढील दोन महिने अशाच अवस्थेस सामोरे जावे लागणार? याचे उत्तर कोण देणार असा सवाल या महामार्गावरून शाळेत व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विचारला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!