किरण लाड
नागोठणे : भारत देशातील 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, नाशिक, पूणे, विभागाच्या समुद्रीलगतच्या भागातील भात हे प्रमुख पिक आहे. महाराष्ट्रातील भात हे पीक “साल” आणि ” धान” या नावाने देखील ओळखले जाते. पाऊस जुन महिन्यात अखेरीस पडल्याने शेतीची पेरणी उशिरा झाली. पेरणी उशिरा झाल्याने रोपाची (आवाण) सरासरी उंची भातशेती लावण्यायोग्य न झाल्याने भात लावणी खोळंबली आहे.
लावणी करतांना भात जातीच्या कालावधीनुसार योग्य वेळेत लावणी करावी लागते. हळव्या भाताच्या जातीची लावणी 20 ते 23 दिवसात तर निमगारव्या जातीची लावणी 25 दिवसात तर गारव्या भाताच्या जातीची लावणी 25 ते 30 दिवसात करावी लागते. परंतु, जुन महिन्यात नक्षत्राप्रमाणे पाऊस न पडल्याने शेतीची पेरणी उशिरा करण्यात आली. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला असता तर, शेतकऱ्यांनी शेतात भाताची पेरणी वेळेवर केली असती, पेरणी झाल्यानंतर जमीन वेळेवर नांगरली असती. भाताचे रोपटे (आवाण) लावण्या योग्य झाले असते तर भातशेतीच्या लावणीची शेतकऱ्यांनी सूरुवात केली असती. पाऊस वेळेवर पडला असता तर काही काही शेतकऱ्यांची भातशेती आषाढी एकादशीला लावुन पूर्ण झाली असती. परंतु, पाऊस जून महिन्याच्या अखेरीस आल्याने रायगड जिल्ह्यातील भातशेती लावणीची कामे खोळंबली आहेत.