मिलिंद माने
महाड : रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या व महाड तालुक्यातून जाणाऱ्या म्हाप्रळ-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे गोठे बु. हद्दीत वडाचे झाड पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. अखेर ग्रामस्थांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे झाड तोडून बाजूला केल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत झाला आहे.
महाड तालुक्यातून जाणाऱ्या म्हाप्रळ-मंडणगड-पंढरपूर रस्त्यावर सकाळी पाच वाजता गोठे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुसळधार झालेल्या पावसामुळे वाऱ्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वडाचे झाड पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. मात्र, राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापनाला कळवून देखील कोणीही आपत्कालीन परिस्थितीत तत्परता दाखवली नाही. त्यामुळे या भागातील जाणाऱ्या 25 गावातील ग्रामस्थांचा संपर्क तुटला होता.
महाड तालुक्यातील गोटे गावचे सरपंच सुनील जाधव व ग्रामस्थांनी स्वतः वृक्ष तोडण्याची मशीन घेऊन रस्त्यावर पडलेले वडाचे झाड तब्बल तीन तास प्रयत्न करून बाजूला काढले व या मार्गावरील जाणाऱ्या प्रवाशांसाठी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. मात्र, आपत्कालीन यंत्रणा किती सुस्तावले याचे उत्तम उदाहरण आज सकाळी गोठे येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पाहावयास मिळाले.