• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण शहरातील मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार का? -बंडू खंडागळे

ByEditor

Jul 15, 2024

विनायक पाटील
पेण :
गेली अनेक वर्ष संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पेण हे मध्यवर्ती ठिकाण. आजच्या परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील त्याचबरोबर पेण तालुक्यातील नागरिकरण कायमस्वरूपी शहरांमध्ये झाले आहे. त्यामानाने शहरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते त्याचबरोबर सर्व बाजारपेठा गजबजलेल्या अवस्थेत दिसत आहेत. निश्चितच फार मोठी आर्थिक उलाढाल पेण शहरातून होत आहे. वाढत्या नागरिकरणामुळे निश्चितच नगरपालिका प्रशासनाला देखील कर उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्या मोबदल्यात अनेक नागरी मूलभूत सुविधा नगरपालिका प्रशासन देणे क्रमप्राप्त आहे. आज अंतर्गत रस्ते पाहिल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. याचा त्रास निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना देखील होत आहे. सध्याची लोकवस्ती पाहता शहरातील अंतर्गत रस्ते फार अरुंद आहेत. फार मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे रुंदीकरण होणे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.

आज शहरातील मुख्य रस्ता गणपती वाडी पुलापासून ते जुन्या रायगड बाजारापर्यंत अनेक ठिकाणी नादुरुस्त, अरुंद, खराब आहे. या रस्त्याचे खऱ्या अर्थाने नव्याने डांबराऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण होऊन दोन पदरी रस्त्याची नव्याने मध्यभागी डिव्हायडर टाकून एलईडी लाइट्स लावून निर्मिती होणे आवश्यक आहे. कुठलाही पर्यटक अलिबाग अथवा मुरुडकडे जात असताना या शहरात ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला निश्चितच या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याबरोबर शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. पेण शहराला इतिहास आहे. शहरांमध्ये अनेक रस्त्यावरती एकतर्फी वाहतूक त्याचबरोबर जागोजागी असणारे रिक्षा थांबे याबाबतीत सुद्धा प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. आज एमएमआरडी त्याचबरोबर रायगड प्राधिकरण महामुंबईमध्ये नव्याने पेण शहर उदयास येत आहे. रायगड जिल्ह्याची आर्थिक राजधानी पेण शहर आणि पेण तालुका आहे. आज शहरांमध्ये अनेक कंपन्यांच्या खाजगी बसेस कामगारांना पेण शहरात घेऊन येत असताना जुन्या रायगड बाजारापासून ते उत्कर्ष नगरपर्यंत जागोजागी थांबत आहेत. त्यातच नव्याने आलेल्या इलेक्ट्रिक बसेस या लांबलचक असल्याने तसेच सध्या गणपती कारखानदारांची उपजीविका वर्षातून एकदा गणपती कारखान्यावर असल्याने आज गणपती बाप्पा शहरा शहरातून घेऊन जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरती टेम्पो लागले असल्याने गणपती कारखानदारांना प्राधान्य देऊन सध्या कंपन्यांच्या बसेस शहराबाहेर गणपती उत्सवापर्यंत ठेवण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या सूचना देणे गरजेचे आहे.

आज वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पेणमधील मूलभूत सुविधा देणे याबाबत नगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. याबाबत लवकरच भारतीय जनता पार्टीचे आमदार रवीशेठ पाटील यांना प्रमुख शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बंडू खंडागळे यांनी सांगितले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!