फळे, भाजीपाला धुण्यासाठी वापरतात रस्त्यावरील पाणी
अनंत नारंगीकर
उरण : शहरातील परप्रांतीय फेरीवाले, हातगाडीवाले हे विक्रीसाठी आणलेली फळे, भाजीपाला धुण्यासाठी गटारातील, रस्त्यावरील घाणीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरी उरणकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा परप्रांतीय फेरीवाल्यांवर, फळे, भाजीपाला विक्रेत्यांवर उरण नगरपरिषदेने कारवाई करावी अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.
उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांचा धाक हा शहरातील हॉटेल, चायनीज पदार्थ आणि फळे, भाजीपाला विक्रेत्यांवर राहिला नसल्याने अनेक व्यावसायिक हे भेसळ करून आपल्या पदार्थांची विक्री करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये वर्तवली जात आहे. त्यातच सोमवारी एका फळे, भाजीपाला विक्रेत्याने आपल्या गाडीवरील खाद्यपदार्थ धुण्यासाठी रस्त्यावरील घाणीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरी उरणकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा विक्रेत्यांवर उरण नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी महिला वर्गातून करण्यात येत आहे.