गाय मालकांचे लाखोंचे नुकसान; नुकसान भरपाईची प्रतीक्षा
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दांडगूरी-नागलोली या मुख्य रस्त्याला जयेश जाधव व दिलीप विचारे यांच्या मालकीच्या चार गायींचा सोमवार, दि. १५ जुलै रोजी सायंकाळी विद्युत शॉक लागून मृत्यू झाला.
नागलोली येथील रहिवासी जयेश जाधव व दिलीप विचारे यांच्या चार गायी दुपारी चरण्यासाठी गेल्या असताना बोर्ला गावच्या बसस्थानका शेजारी असणाऱ्या शेतात चरत असताना तिथून जाणाऱ्या विद्युत खांबाची तार अंगावर पडल्याने काही क्षणातच चार गायींचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जवळपास सहा लाखाचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे.

या आडमार्गावर सतत पावसाळी वृक्ष कोसळून विद्युत वाहिन्या तुटून लहानमोठ्या अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा अपघातात अनेक निष्पाप जीवांना हकनाक जीव गमवावा लागत आहे. यावेळी वीज वितरणच्या गलथान कारभाराचा फटका या जाधव व विचारे कुटुंबांना बसला आहे. महावितरणने विद्युत कामे वेळीच केली असती तर हे दुर्दैव घडले नसते. घटना समजताच सायंकाळी महावितरण कर्मचाऱ्यांकडून विद्युत वाहिनी बंद करण्यात आली.
काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे श्रीवर्धन परिसरात पुर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. याच मार्गावर कार्ले गावानजीक नदीला पूर आल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. यामध्ये जयेश जाधव यांच्या तीन गायी व दिलीप विचारे यांची एक गाय असून यावेळी या अपघातात चार गायींचा मुत्यु झाल्याने दोन्ही कुटूंब आर्थिक संकटात सापडले. नागलोली परीसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करीत असतात हेच त्यांचे उदरनिर्वाहाचा मुख्य साधन असल्याने या शेतकऱ्याला शासनाकडून लवकरच आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
जीवाशी खेळ
श्रीवर्धनमध्ये अनेक ठिकाणी तारा लोंबकळत दिसतात तर विजेचे खांबही पडण्याच्या स्थितीत आहेत. अशातच वीज प्रवाह सुरू असतो. महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मुक्या जीवांना प्राण गमवावे लागले. त्या ठिकाणी नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला.