पर्यटक युवतीच्या मृत्यूनंतर शासनाला आली जाग
सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट, देवकुंडसह कुंभेलाही मनाई
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून शासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून माणगाव उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारानुसार माणगांव उपविभागांतर्गत माणगांव तालुक्यातील मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट”, “ताम्हाणी घाट” व आजुबाजूच्या १ कि.मी. परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ नुसार यापूर्वीच बंदी घातली होती. त्यानंतर आता कुंभे जलविद्युत प्रकल्प परिसरात ता. १६ जुलै २०२४ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत १४४ कलमाचे लॉक लावले आहे.
वर्षासहलीसाठी येणाऱ्या उत्साही पर्यटकांनी तिथून जवळच असणाऱ्या कुंभे जलविद्युत प्रकल्प परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी मौजमजा करण्यासाठी कूच केली आहे. नुकतीच मुंबई येथून आपल्या मित्रांबरोबर वर्षा सहलीसाठी आलेली २७ वर्षाची तरुणी कुंभे येथील दरीत घसरून पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर माणगाव उपविभागीय अधिकारी यांनी त्या ठिकाणी १४४ कलम लावून पर्यटकांना बंदी घातली आहे. वास्तविक देवकुंड, ताम्हिणी घाट व सिक्रेट पॉईंट येथील धबधबा व परिसरात पर्यटकांना बंदी ज्या दिवशी घातली होती त्या दिवशी कुंभे जलविद्युत प्रकल्पच्या परिसरात बंदी घालण्याची गरज होती. या दुर्घटनेपूर्वी परिसरात बंदी घातली असती तर या युवतीचे प्राण वाचले असते अशी पर्यटकातून चर्चा आहे.
रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट” येथे फौजदारी प्रक्रिया, संहिता १९७३ चे कलम १४४ (नविन कायद्यानुसार, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३) च्या तरतुदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. सदरचा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. हि ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सन २०१७ चे पावसाळी हंगामात सदर ठिकाणी भेट दिलेल्या पर्यटकांमधील ४ पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन मृत्यूमुखी पडले होते. तसेच सुमारे ५५ पर्यटक हे अचानक पाण्याचा जोर वाढल्याने नदीचे पात्राचे ठिकाणी अडकले होते. सन २०१८ चे पावसाळी हंगामातदेखील फौजदारी प्रक्रिया, संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेशाची मुदत संपलेनंतर ३ पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते व मृत्युमुखी पडले होते.
सन २०२२ मध्ये एक पर्यटक नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मयत झालेला आहे. त्याचबरोबर सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हीणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवितहानी होऊ शकते. या कारणांमुळे “देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट” ही पर्यटन स्थळे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने ह्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश पारीत केले आहेत. नुकताच ता. १६ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्प परिसरातील एक किमी अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे पर्यटकांना आता कुंभे परिसरात बंदी घातल्यामुळे फिरता येणार नाही.
पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्या जागेवर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे, इ. ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हिडीओ बनविणे, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे, धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जीवितहानी होईल, असे धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे, रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, वाहने अतिवेगाने व वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करतांना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डीजे सिस्टिम वाजवणे, गाडीमधील स्पिकर, उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, धरण, तलाव, धबधब्याचे १ कि.मी. परिसरात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, सहा चाकी वाहनांनी प्रवेश करणे. अशी बंदी घातली आहे.