वृत्तसंस्था
मुंबई : शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार या योजनेची घोषणा केली होती. या योजनेची जाहिरात आता चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या जाहिरातीवर जे वृद्ध नागिरक दाखवलेत तेच गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जाहिरातीवर चक्क तीन वर्षापासून घरातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो आल्याने कुटुंबालाही धक्का बसला. शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्र्वर विष्णू तांबे 68 वर्षीय वृध्द हे गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असल्याचे त्यांची सून सुरेखा तांबे यांनी बोलताना दिली. सासरे हे महिना महिना घरी येत नसायचे मात्र मागील तीन वर्षापासून ते घरी आलेच नाही, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही तक्रार आम्ही केली नाही. पण आता जाहिरातीवर फोटो पाहून आनंद झाल्याचं सुरेखा तांबे म्हणाल्या.
सरकार कोणतंही असो आपल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्याआधीच ज्या योजनेची ते जाहिरातबाजी करत असतात. अशा जाहिरातींसाठी सरकार कोट्यवधींचा निधी उधळत असतं. त्यामुळे अनेकदा या जाहिराती वादातही सापडतात. मात्र, शिंदे सरकारची एक जाहिरात वेगळ्याच कारणामुळे वादात सापडली आणि सरकारची कोंडी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे मागच्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा खूप शोध घेतला. परंतु ते कुठेच सापडले नाहीत. अखेरीस तीन वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या तीर्थदर्शन योजनेच्या जाहिरातीवर त्यांना ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसला आणि त्यांना धक्काच बसला.
या जाहिरातीला आता राजकीय रंग आला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत, सरकारला लक्ष्य केलं आहे. या सरकारला जाहिरातीचा किती सोस आहे याचे अजून एक उदाहरण, असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलंय. विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्री वाजत गाजत योजनेची जाहिराती करतात. काम केलं असेल, तर खुशाल जाहिरात करावी. परंतु खोटं बोलताना थोड भान ठेवायला हवं. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची ही बातमी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या जाहिरातीमुळे तांबे कुटुंबीयांना किती मनस्ताप होत असेल? सरकारच्या जाहिरातीसाठी जनतेचा पैसा असाच वाया जातोय आणि ते करताना जनतेच्या फोटोंचा अवैधपणे वापर करणे हा किती मोठा गुन्हा आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियावरून व्यक्तीचे फोटो डाऊनलोड करणे आणि परवानगी शिवाय जाहिरातीत वापरणे ही गंभीर बाब आहे. महायुतीच्या योजना जशा पोकळ आहे, तशाच जाहिरातीसुद्धा पोकळ आहेत. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावा, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे.
नातेवाईकांना आनंद झाला असेल फोटो बघून तरी सापडतील ।
सापडल्यावर नक्कीच बातमी द्या ।