हरेश मोरे
साई /माणगांव : रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यातील बळीराजाचा आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. माणगाव तालुक्यातील गोरेगाव-लोणेरे प्रेस असोसिएशनने या वर्षी पन्हळघर (खुर्द) येथील युवा होतकरू शेतकरी श्रीराम दीपक करकरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याचे औचित्य साधून शिवसेना युवासेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महाड विधानसभा युवासेना समन्वयक रोहित पारधे यांनी पन्हळघर येथे जाऊन या युवा शेतकऱ्याचा आणि त्यांच्या पत्नी विजया या दोघांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
तसेच पन्हळघर (खुर्द) गावचे माजी पोलीस पाटील रमेश जाधव हे ३८ वर्ष सेवा बजावून निवृत्त झाले. यांचाही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमात समन्वयक रोहीतदादा पारधे यांनी आपले मनोगत मांडताना सुरुवातीलाच बळीराजाचा सन्मान करणाऱ्या पत्रकार संघटनेचे कौतुक केलेच आणि लाखाच्या पोशिंद्याची जाण ठेवणारे पत्रकार बंधूंचे सुद्धा गौरवोद्गार काढले. आजच्या तरुण पिढीने पुढे येऊन शेती आणि त्यास पूरक अश्या नवनवीन व्यवसायात सक्रिय होत आहे याचा अभिमान असल्याचे म्हटले. तसेच शेतकरी राजा जगला तरच शेतीचे अस्तित्व राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत रोहित पारधे व्यक्त केले.
त्या प्रसंगी गावचे तरुण सरपंच हरदास शेडगे, युवासेना माणगाव तालुका अधिकारी रंजीत मालोरे, तालुका सहसमन्वयक सुरेश मनवे, विभाग अधिकारी अनिष बामणे तसेच शिवसेना विभाग संपर्कप्रमुख मंगेश निगडे, शाखाप्रमुख राजेंद्र शिंदे, कॉलेज कक्ष अध्यक्ष प्रतीक साळुंखे, गणेश निगडे, गणपत शेडगे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.