• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे खड्ड्यातूनच कोकण दर्शन!

ByEditor

Jul 24, 2024

मिलिंद माने
महाड :
मागील सतरा वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, आत्तापर्यंतच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना व सत्ताधाऱ्यांना हा महामार्ग सुस्थितीत ठेवण्यात यश आले नाही. आज 18व्या वर्षीदेखील या महामार्गाची पूर्णपणे चाळण झाली असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना देखील आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोकण दर्शन करण्याचा अनुभव पाहण्यास मिळणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची मागील सतरा वर्षात मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून उन्हाळ्यात सुस्थितीत असणारा महामार्ग पावसाळ्यात खड्ड्यात जातोच कसा? असा प्रश्न कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांना पडला आहे. मात्र याचे उत्तर ना सत्तेत असणारे राज्यकर्ते देऊ शकत, ना कोकणातील निवडून जाणारे आमदार, खासदार देऊ शकत. परिणामी कोकणातील जनतेच्या नशीबी मागील सतरा वर्ष या खड्ड्यातून प्रवास करणे लिहिले आहे. यामुळे हजारो चाकरमान्यांचे अपघातात बळी गेले आहेत तर कित्येक चाकरमानी कायमचे जायबंदी झाले आहेत. मात्र आज मितीस देखील यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात सरकारला यश आलेले नाही.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या कामाच्या पूर्णत्वास दरवर्षी तारीख पे तारीख दिली जाते. मात्र दिलेल्या तारखेला हा राष्ट्रीय महामार्ग काही पूर्ण होत नाही. याचा अनुभव कोकणकर जनतेला मागील सतरा वर्षापासून येत आहे. जो महामार्ग पूर्ण केला आहे त्या महामार्गाला देखील अनेक ठिकाणी तडे पडले आहेत, तर अनेक ठिकाणी संरक्षण भिंती खचल्या आहेत. तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा कशेडी बोगद्यातून मोठ्या प्रमाणावर होत असलेली पाण्याची गळती राष्ट्रीय महामार्ग खाते थांबवू शकले नाही. त्यातच चार दिवसापूर्वी खेड भरणा नाका येथील जगबुडी नदीवर असलेल्या पुलाला तडे गेले होते. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वासाठी स्थापन झालेल्या जन आक्रोश समितीमार्फत 28 जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव एसटी स्टँडसमोर सकाळी 11 वाजता होम हवन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी कोकणातील विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा दौरा 24 जुलै ते 26 जुलै या दरम्यान होत आहे. रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात हा दौरा करण्यात येत आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमधूनच आज राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कोकण दर्शनाचा अनुभव घ्यावा लागणार आहे.

पॅकेज एक ते दहाची पाहणी करणार?

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण हे 24 जुलै रोजी सकाळी पनवेल येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी बैठक व सत्कार समारंभात उपस्थितीत राहणार आहेत तर दुपारी पेण येथे भारतीय जनता पार्टी व जिल्हा कार्यकारणी बैठक व सत्कार समारंभास उपस्थित राहणार आहेत. पेण येथून सायंकाळी साडेसहा वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणकडे ते रवाना होणार आहेत. मात्र, पेण ते चिपळूण या पट्ट्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ची झालेली दुरवस्था, रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला लागलेली गळती, खेड येथील भरणा नाक्यावरील जगबुडी नदीवरील नव्या पुलाला गेलेले तडे व चिपळूण येथील बहादूर शेख नाक्यावरील नव्या पुलाचे बांधकाम चालू असताना पडलेल्या उड्डाणपूल व चिपळूणमधील डी. बी. जे. कॉलेज संरक्षक भिंत कोसळून सिद्धांत घाणेकर या विद्यार्थ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू या सर्व घटनांची बांधकाम मंत्री कोणत्या वेळेत पाहणी करणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून प्रवास करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पॅकेज एक ते दहाची पाहणी करणार आहेत. तरी या दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याचे संबंधित अधिकारी, कंत्राटदार व लोकप्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे मंत्री महोदयांचा दौरा हा रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा जिल्हा कार्यकारणीच्या बैठकी व सत्कार समारंभ असताना राष्ट्रीय महामार्ग खात्याची ते कधी पाहणी करणार? असा प्रश्न या निमित्ताने कोकणातील चाकरमान्यांना पडला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!