शनिवारी शानदार कार्यक्रमात होणार पुरस्कार प्रदान सोहळा
मुंबई : विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका प्रज्ञा राजेश पोवळे यांना जाहीर झाला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रज्ञा पोवळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना विश्व संवाद केंद्र मुंबई तर्फे दरवर्षी महर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदाच्या पुरस्कारसाठी एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका व असिस्टंट प्रोड्युसर प्रज्ञा पोवळे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. रोख रक्कम व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा पुरस्काराचे हे २३ वे वर्ष आहे. प्रज्ञा पोवळे या मूळ नागोठणे येथील रहिवासी असून सध्या त्यांचे वास्तव्य ठाणे येथे आहे. दैनिक सामनाचे मुख्य वृत्त संपादक राजेश पोवळे यांच्या त्या कन्या आहेत.
शुक्रवारी २६ जुलै रोजी दादर येथील कीर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. आज तक वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक सुधीर चौधरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रज्ञा पोवळे यांच्यासह पत्रकारिता आणि समाज माध्यमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अन्य आठ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे, धीरज वाटेकर अक्षय मांडवकर, ओमकार दाभाडकर, गौरव ठाकूर, सचिन गायकवाड, वनश्री राडये यांचा समावेश आहे.