वृत्तसंस्था
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान वधाचा १८ फुटाचा भव्य पुतळा साकारला जाणार आहे. प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वाघ नखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले होते. तसेच यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा उभारला जाणार आहे. याची पहिली झलक समोर आली आहे.
हे शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन, सातारा’ आणि अन्य संघटनांकडून सरकारला विनंती करण्यात आली होती. आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पुतळा बसवण्याची घोषणा केली होती. आता येत्या महिनाभरात या पुतळ्याचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून अफझलखान वधाचा प्रसंग जिवंत करणाऱ्या या १८ फुटी पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले. हा पुतळा सध्या पुण्यात असून शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावरील लढाई आजही शिवप्रेमींच्या कौतुकाचा विषय आहे. किल्ले प्रतापगडावर दरवर्षी शिवप्रताप दिन साजरा केला जातो. तसेच या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही वर्षापासून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफलजलखानाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सरकारकडून प्रतापगडाच्या पायथ्यावरील अतिक्रमणे काढली आहे. हिंदुत्त्वादी संघटनांकडून अनेकदा अफजलखानाची कबर उखडून टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर आता येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहे.