• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मूनवली विभागातील शेतकरी दमदार पावसामुळे सुखावला!

ByEditor

Jul 26, 2024

शेतीच्या कामाला आला वेग

शेती न विकता तरुण पिढीने शेती व्यवसायकरिता पुढे येण्याची गरज

अब्दुल सोगावकर
सोगाव :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस बरसत असल्याने मूनवली विभागातील शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकामाला जोमाने सुरुवात केली आहे.

मागील काही काळापासून रायगड जिल्ह्यातील बहुतांश एकत्रित कुटुंब असणारी शेतकऱ्यांची कुटुंब ही मोठ्या प्रमाणात विभक्त झाली आहेत. शेती करण्यासाठी तरुण पिढी शेती कामाला पुढे येत नाही. कुटुंबाची हवी तशी साथ मिळत नाही आणि शेती कामाला शेतमजूर मिळत नाही. बियाणे, खते यांचा सुरुवातीचा होणारा खर्च यानंतर नांगरणी, लावणी, बेननी, कापणी, मळणी यासाठी होणाऱ्या मजुरीचा खर्च पाहता होणाऱ्या उत्पादनाच्या मानाने आणि जर निसर्गाची साथ लाभली तरीही हाती काहीच लागत नाही. अश्या अनेक कारणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडून हवालदिल झाला आहे.

सोगाव, मूनवली खलाटीत सध्या लावणीसाठी मजुरांना जेवणासह ४०० रुपये मजुरी देण्यात येत आहे, तर बैलांची नांगरणीकरिता १००० रुपये मजुरी देण्यात येत आहे. काही ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने नांगरणीकरिता तासाला ६०० रुपये इतका दर आकारला जात आहे. रायगड जिल्हा हा भाताचा कोठार समजला जात होता. परंतु, शेतकऱ्यांनी शेती करणे परवडत नसल्याने ती विकण्यात धन्यता मानली आहे. मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोगाव, मूनवली येथील खलाटीत यापूर्वी सरासरी तीनशे एकर भातशेती लावली जात होती. या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भातशेती विकल्यामुळे फक्त शिल्लक १५ एकरवर भातशेती लावण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कारखानदार, उद्योजक, फार्म हाऊसकरिता मुंबई, पुण्याच्या गर्भश्रीमंतांना विकल्यामुळे भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या सोगाव, मूनवली या गावासह रायगड जिल्ह्याचे नाव पुसले जात असल्याचे दिसून येत असल्याने अनेक वयोवृद्ध, समाजसेवक जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.

मात्र याला अपवाद आहेत मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शेतकरी असलेले सचिन घाडी. सचिन घाडी हे आपली आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा आपली शेती न विकता स्वतःच शेती करत आहेत. याबाबत इतर नवीन तरुण पिढीतील शेतकऱ्यांना व नवीन पिढीला शेती व्यवसाय करण्याचा चांगला संदेश देत आहेत. शेतकऱ्यांनी घाडी यांच्या सारख्या नवतरुण शेतकऱ्यांचे अनुकरण करत शेतजमीन न विकता आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!