• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कारगिल युद्धातील शहीद जवान सहाणगोठी गावाचा सुपुत्र शहीद निलेश तुणतुणे

ByEditor

Aug 1, 2024
अमुलकुमार जैन
अलिबाग-रायगड

त्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील छोट्याश्या सहाणगोठी गावातील तेवीस वर्षीय जवान निलेश तुणतुणे हा भारत भूमीची रक्षा करीत असताना शत्रुच्या हल्ल्यात शहीद झाला अन अलिबाग तालुक्याचे नाव देशात गेले. शहिद निलेश तुणतुणे याचा जन्म ६ फेब्रुवारी १९७५ साली अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रोहा या राज्य महामार्गालगत असणाऱ्या सहाणगोठी या गावात निर्मला नारायण तुणतुणे या वीरमातेच्या पोटी झाला. निलेश याचे प्राथमिक शिक्षण हे गावात झाले अन् पुढील अलिबागच्या जे. एस. एम. कॉलेजमध्ये झाले. निलेश हा बालपणापासून कबड्डी सारख्या मैदानी खेळात निपुण होता. जेएसएम कॉलेजमध्ये असताना त्यांनी एनसीसीमध्ये असताना देशसेवा करण्याचे ध्येय बाळगून निलेश अलिबाग येथे होणाऱ्या लष्कर भरतीकडे वळला. अशाच अलिबागमध्ये झालेल्या भरतीमध्ये तो लष्करातील शिपाई पदासाठी निवड झाली. त्याची रवानगी सैनिकी प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथील सैनिकी प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाले आणि तो मराठा बटालियन तुकडीचा तगडा लढाऊ शिपाई म्हणून देशसेवेस सज्ज झाला.

लहानपणापासूनच खिलाडूवृत्ती, नेतृत्वगुण त्याच्या अंगी कबड्डीच्या मैदानातच भिनले होते. या नेतृत्व गुणाची पारख कडक शिस्तीतील लष्करी अधिकाऱ्यांना झाल्याशिवाय राहिली नाही. त्याचे नेतृत्वगुण उफाळून आले. कृतीतून व्यक्त झाले. म्हणूनच त्याचे कौशल्य आणि कामगिरी पाहुन एका तुकडीची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली. त्याच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वगुणांचा गौरव लष्कराने केला. त्याने उत्कृष्ट नेमबाज म्हणून लष्करात नाव कमावले होते. एका बाजूला भारत-पाकिस्तान मैत्री करावयाचे राजकारणी चित्र पाकिस्तानने उभे केले आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या पवित्र भूमिचा इंच इंच भाग बळकाविण्याचे कट कारस्थाने पाकिस्तानने रचले होते. भारतात पाकिस्तानने अतिरेकी कारवाया सुरु केल्या. पण भारतीय फौजांनी वेळोवेळी या कारवायांना ठेचून काढले. निलेश तूणतूणे हा उत्कृष्ट नेमबाज जवान. आपल्या बंदुकीने घेतलेल्या वेधावर त्याचा गाढ विश्वास होता. म्हणूनच त्याला गनमास्टर म्हणून सगळे ओळखत होते.

मान्सून तुफान सुरु झाला होता. धुवांधार बर्फवृष्टी सुरु होती. हवेत कडाक्याचा गारवा पसरलेला होता. डोंगरमाथे स्वतःभोवती शुभ्र धुक्याची झालर लपेटून बोचऱ्या थंडीचा आस्वाद घेत होते. रंगबेरंगी फुलांनी नटलेली धरणी हिरवागार शालू नेसून त्यावर धवल रंगाची शाल पांघरून निसर्गाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. नितळ पाण्याचे खळाळते नदी-नाले जणू मावळत्या सूर्याच वंदन गीत गात होते. तसं जम्मू काश्मीर म्हणजे स्वर्गच जणू. मग तिथे ऋतू कोणता का असेनात. हिवाळ्यात भारतीय सैन्य आपल्या चौक्या सोडून खाली उतरलं होतं. नेमका याच संधीचा फायदा घ्यायचा आणि भारतीय चौक्यावर ताबा मिळवायचा असा शकुनी प्रयत्न पाकिस्तान सेना प्रमुख जनरल मुशर्रफ यांनी चालवला. त्यासाठी ठिकाण निवडल गेल कारगील!

कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगील वसलेले आहे. एकदा का कारगिल ताब्यात आल की राष्ट्रीय महामार्ग १ अ तोफांच्या टप्प्यात येणार होता. अन तोफांच्या टप्प्यात येणारा मार्ग म्हणजे भारतीय सेनेची रसद तोडण्याचा प्रभावी मार्ग. हा अतिशय भयंकर डाव नवाज शरीफ अन मुशर्र्फ यांनी आखला होता. या कारवाईला “ऑपरेशन बद्र” असे नाव देण्यात आले.

1 ऑगस्ट 1998 रोजी भारतीय सीमारषेजवळ श्रीनगर बारामुल्ला येथे आपल्या तुकडीसह गनमास्टर निलेश हे गस्त घालत होते. पाकिस्तानी घुसखोरीच्या हालचालीवर त्यांच्या तुकडीचे बारीक लक्ष्य होते. अगोदर शांत असलेला परिसर ज्वलनाच्या आगडोबांनी उजळून गेला. अतिरेक्यांनी तोफांचा भडिमार अचानक सुरु केला. गनमास्टर निलेश तुणतूणे त्याचे प्रतिउत्तर तितक्याच् जोमाने देऊ लागले. तोफांचा भडिमार प्रचंड सुरु होता. त्यातच प्राणपणाने लढत असलेल्या निलेश तूणतूणे यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.

“जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले”

सहाणगोठीचा हा पराक्रमी पुत्र वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी शहीद झाला. अलिबागच्या या रणसम्राट भूमीपुत्राने अखेरची चिरनिद्रा घेतली ती भारतमातेच्या कुशीतच. अलिबागजवळच साधारण दहा किलोमीटर अलिबाग-रोहा राज्य महामार्गावर सहाणगोठी हे लहानसे गाव आहे. या गावाची ओळख म्हणजे येथील निलेश तुणतुणे यांचे स्मारक! मुख्य रस्त्यावर हाताच्या उजवीकडे दिसणारे हे स्मारक म्हणजे अलिबागमधील एका वीरपुरुषाच्या धैर्याची साक्ष देणार ठिकाण. येथे पत्र्याच्या छताखाली भारतीय सैन्याच्या गणवेशात निलेश यांचा अर्धपुतळा सिमेंटच्या चौथऱ्यावर उभा दिसतो. मागील भिंतीवर निलेश यांच्या आयुष्यातील काही क्षणांचे फोटो लावलेले आहेत. त्यांच्याबद्दल एक लहानसा लेखही लिहिलेला आहे. त्यांचा स्मृतिदिन येथे साधेपणाने साजरा केला गेला. पोलिसांतर्फे निलेश तुणतुणे यांना मानवंदना देण्यात आली. दरवर्षी येथे हा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. या गावात निलेश यांचे आई-वडील २ भाऊ व बहीण राहतात.

अलिबाग-रोहा रस्त्यावर सहाणगोठी येथे निलेश तूणतूणे यांचे स्मारक उभे आहे. त्याच स्मारकासमोर तेवणारी ज्योत रस्त्यावरुन जाणायेणाऱ्याला निलेशच्या पराक्रमाने पुलकित करीत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!