शशिकांत मोरे
धाटाव : रोह्यातील ओंकारेश्वर मंदिरात श्री धाविर महाराजांच्या सप्ताह सोहोळ्याचे ब्राम्हण मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या सोहोळ्यात विजय जोशी यांनी सादर केलेल्या “आठवणीतल्या गाण्याच्या आठवणी” या कार्यक्रमाला श्रोतेगणांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
अविरतपणे सुरू असलेल्या १२४व्या वर्षीही ओंकारेश्वर मंदिरात धाविर महाराजांच्या सप्ताह सोहोळ्याचे ब्राह्मण मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. काल शेवटच्या दिवशी विजय जोशी यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या कल्पनेतून “आठवणीतल्या गाण्यांच्या आठवणी” हा कार्यक्रम सादर केला. यामध्ये आपण ऐकत असलेल्या विविध प्रकारच्या मराठी गाण्यांची निर्मिती कशी झाली असेल? त्या गीताचा अर्थ काय असतो? नाट्यसंगीत, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक यांच्या भावना काय असतील? गीतकराच्या मनांत काय असेल? गीतकारांनी गीत लिहिल्यावर त्याला चाल कशी सुचली असेल? किती चाली निर्माण कराव्या लागल्या असतील? केलेली कलाकृती निर्मात्याला रंगभूमीवर पहाता आली असेलच का? ही सर्व लोक आपले आयुष्य कशा प्रकारे जगले? त्यांची सर्वांची पार्श्वभूमी काय? त्यांनाही तुमच्या आमच्या सारखा संसार करताना अनेक अडचणी आल्या असतील का? मग त्या उलगडून सांगण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे प्रथमच त्यांनी केला.
या कार्यक्रमा दरम्यान त्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रोह्यातुन अनेकांनी हजेरी लावली होती. महिला वर्गाची उपस्थिती अधिक असल्याचे पहावयास मिळाले. याठिकाणी एक आगळा वेगळा विषय ऐकायला मिळाल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले.