श्रावणी सोमवारला भाविकांची मंदिरात होतेय दर्शनासाठी मोठी गर्दी
सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हा तालुका रायगड जिल्ह्यातील आकाराने सर्वात मोठा तालुका म्हणून प्रसिध्द असला तरी प्राचीन परंपरा, ब्रिटीशकालीन पूल, इमारती आणि कोकणातील प्रसिध्द व्यापारी पेठ यामुळे माणगाव गावाला जास्त महत्व प्राप्त होत गेले. राजकीयदृष्ट्या स्व.अशोकदादा साबळे यांचे माणगाव म्हणूनही या तालुक्याची ओळख आजही फार महत्वाची ठरत असली तरी सहाव्या ते सातव्या शतकात या माणगावात फार मोठा पराक्रम होवून गेल्याचे येथील काही प्राचीन मूर्तीच्या आधाराने स्पष्ट होत आहे. आज काळ आणि गोद नदीच्या संगमावरील माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील श्री स्वयंभु संगमेश्वर देवस्थानच्या मंदिराच्या जिर्णोद्धारामुळे व मूर्त्यांच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे माणगाव गावाला धार्मिकदृष्ट्या महत्व प्राप्त होत आहे. या संगमेश्वर मंदिरात दरवर्षी प्रत्येक श्रावणी सोमवारी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून महिनाभर अनेक भाविक उपवास करून देवाची पूजाआर्चा करीत असतात.
संगमेश्वराची कहाणी
ई.स. १६३० साली माणगावमध्ये जोगळेकर या शेतकऱ्याचे शेतात नांगरताना नांगराच्या फाळाला टणक दगड लागला व त्यातून पाणी येवू लागले. पहिल्या दिवशी जोगळेकरांनी तितकस मनावर घेतलं नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी दुध येवू लागले आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी रक्त येवू लागले. त्यामुळे सर्व गावात एक आश्चर्याचं वातावरण पसरू लागलं. सर्व ग्रामस्थ एकत्र जमले आणि त्या शेतातील सर्व माती काढू लागले. हळूहळू तो दगड म्हणजे एक मोठी शिवपिंड असल्याचे जाणवले. स्वयंभू शंकराने माणगावात गोद आणि काळ नदीच्या संगमावर भाविकांना दर्शन दिले होते. तेंव्हापासून या स्थानाला श्री संगमेश्वर असे संबोधू लागले. त्यानंतर माणगाव गावाला एका धार्मिक स्थानाच महत्व प्राप्त होवू लागले. या मंदिराच्या जवळच मारुतीचे मंदिर आहे. श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक, पूजा अर्चा नित्यनियमाने केली जाते. येथील जंगम घराण्याकडून संपूर्ण पूजा अर्चा केली जाते. माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या या संगमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, संकष्टी चतुर्थी, आषाढी एकादशी, दीपोत्सव कार्यक्रमाला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. शेजारील मारुती मंदिरात देखील चैत्र वैद्य सप्तमीला मोठी यात्रा भरते.
१६३० साली या संगमेश्वराने दर्शन दिल्यानंतर याच भागात त्याच्याही पूर्वीची काही कोरीव लेणी विरगळ येथे सापडली. ती अजूनही येथील ग्रामस्थांनी जपून ठेवली आहेत. त्यामधील एका मूर्तीमध्ये भाला घेवून लढणारी एक आकृती दिसते. त्यावरून यथे कोणत्यातरी राजाने फार मोठा पराक्रम केल्याचे दिसते. परंतु, त्यावर तेवढा अभ्यास केलां गेला नाही किंवा ती माहिती तेवढी उजेडात आली नाही. या संगमेश्वर देवस्थानांविषयीची सनद मात्र अजूनही जंगम घराण्याकडे असल्याचे ढालघर येथी पुजारी जंगम यांनी सांगितली. परंतु, ती सनद आज जीर्णावस्थेत असल्याचे समजते. त्यानंतर परकीय आक्रमणात महाराष्ट्रातील ज्या देवदेवतांची व देवळांची तोडमोड करण्यात आली. त्यात या संगमेश्वर देवास्थानाची सुद्धा तशीच अवस्था झाली.
सन १९४६ सालापर्यंत या देवस्थानाची मालकी ट्रस्टी कै. हरी वामन भाटे यांचेकडे होती. समोरच दीपस्तंभ त्याचेसमोर नंदी आणि कौलारू छप्पर असलेले घरासारखे एक मंदिर म्हणून येथे भाविक आपले मनोरथ पूर्ण होण्याच्या दृष्टीने ये–जा करीत होते. कै. हरी वामन भाटे आणि कै. रामचंद्र राजाराम पाटणकर यांनी या मंदीराचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. १९४६ साली त्याची रजिस्टारकडून नोंदणी करण्यात आली. ए.२७१/ कुलाबा अशी नोंदणी क्रमांक श्री संगमेश्वर देवस्थान माणगाव अशा नावाने आजही हि संस्था कार्यरत आहे. ग्रामस्थांचे हे देवस्थान संपूर्ण गावाच्या ताब्यात घेवून याचा कार्यभार सांभाळावा अशी इच्छा होती. त्याप्रमाणे कै. हरी वामन भाटे यांचेनंतर त्यांचे चिरंजीव शंकर हरी भाटे यांचेकडे गाववाल्यांनी तगादा लावला. परंतु शिस्तप्रिय व प्रामाणिक सेवा करणारे शंकर भाटे यांचा विश्वास न बसल्यामुळे ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यास ते तयार होत नव्हते. तीन–साडे तीन वर्षे गावकरीही मागणी करीत होते. मात्र ११ मार्च १९९७ रोजी प्रतिष्ठित ग्रामस्थ स्व. आमदार अशोकदादा साबळे यांच्या पुढाकाराने भाटे यांची परवानगी घेवून पहिली सभा झाली. भाटे यांची खात्री पटली आणि देवस्थान ग्रामस्थांच्या ताब्यात देवून त्याचा यथोचित जिर्णोद्धार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले.
अशोकदादा साबळे यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्वर जिर्णोद्धार कमिटी स्थापली गेली. यात गावातील मराठा, ब्राम्हण व विशेषतः गुजराथी मंडळी एकत्र आली आणि आता श्री संगमेश्वराच्या कृपेने संपूर्ण माणगाव परिसराचा कायापालट करण्याचा मनोदय हि मंडळी करीत आहेत. आज जवळ जवळ ११ ते १२ लाख रुपये रोख देणगीद्वारे आणि इतर पाच लाखापर्यंत वस्तुरूपाने देणगी गोळा करून या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. त्यामुळे माणगावच्या सौंदर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला हे निश्चित.
माणगाव तालुक्यातील कान्होजी आंग्रेकडे नोकर असलेल्या खंडोजी मापकरांचे समाधी असलेले खरवली हे ठिकाण तळागड येथील शिवकालीन किल्ला, कुडे येथील २६ बौद्ध लेण्या, त्यावरील असंख्य शिलालेख, पाण्याच्या अकरा टाक्या, वडघर येथील साने गुरुजी स्मारक, निजामपूर येथे शहाबुद्धीन खानने संभाजी महाराजांचा पराभव केला ते ठिकाण, सन १८२५ ते १८७५ हा कालखंड गाजविणारे थोर समाजसुधारक विष्णुबुवा ब्रम्हचारी हे या शिरवलीचे महादेव मल्हार, नारायण मल्हार, वामन मल्हार, जोशी या विचारवंत साहित्यिकांची हि भूमी आणि आपली राजकीय कारकीर्द लोकसभेपर्यंत नेणारे माजी मुख्यमंत्री व लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांची हि भूमी साऱ्या पर्यटकांना आकर्षित करणारी होतीच त्यात आता श्री संगमेश्वराच्या पवित्र आणि भव्य मंदिरामुळे अजूनच आकर्षित करणारी ठरणार आहे.
माजी आमदार स्वर्गिय अशोकदादा साबळे यांची स्वप्नपूर्ती
स्वर्गिय अशोकदादा साबळे यांचे मित्र कै. रवी शेठ यांच्या मनात बरेच दिवस असलेली संगमेश्वर मंदिराच्या जीर्णोधाराची कल्पना मला बरेच दिवस भेटला की ऐकून दाखवायचा. एके दिवशी सोमवारी बेल वहायला मंदिरात त्यांचे सोबत आले असता समोर भली मोठी मस्जीद दिसली आणि त्याचक्षणी केवळ चाळीस उंबरठा असलेल्या वस्तीकडून एवढी चांगली इमारत बांधून होते मग आपले मंदिर आपण का करू शकत नाही या विचाराने दादांच्या मनात घर केले होते.
रवीचा तगादा चालूच होता. त्याच दिवशी ग्रामस्थांची मिटिंग बोलावली आणि मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या विषयाला शिक्का मोर्तब केले आणि मनाने ध्यास घेतला. कै. ताडफळे, जंगम, महेंद्र गांधी, नथुराम पारखे, उमेश शेठ, दीपक साबळे, मेथा, देवधर, विजयशेठ मेथा, चिमनलाल मेथा, सचिन गोरेगावकर, घनश्याम शेट, कृष्णा दोशी या आणि इतर साऱ्या देणगीदारांनी अथक परिश्रम घेतले आणि तीन ते चार वर्षात हे भव्य दिव्य मंदिर उभे करू शकले. यासाठी पुण्याचे आर्कीटेक्ट श्री संत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. दादलीचे सुतार गुरुजी, आरसीसी डिझायनर भिलारे यांनी आपला वेळ याठिकाणी भक्ती म्हणून दिला आणि त्यातूनच हे भव्य मंदिर स्वर्गिय दादांच्या मते एक गावाच्या विकासाचे एक केंद्र तयार झाले.
आता या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बदल करून माणगावचा कायापालट करण्याचा निश्चय दादांनी घेतला होता. काळ आणि गोद नदीच्या संगमावरच्या घाटाचे सौंदर्यीकरण घाट ते मंदिर या नियोजित रस्त्याचे रुंदीकरण व नुतनीकरण मंदिराच्या जागेभोवती सुसज्ज बाग, मारुती मंदिर परीसराशेजारी नदीकिनारी बोटिंग क्लब, नवीन कोर्टाच्या इमारतीशेजारील शैक्षणिक संकुल, त्यात लॉ आणि इंजिनिअरींगचे अभ्यासक्रम असे नवनवीन प्रकल्पातून येथील पर्यटन विकास व त्या अनुषंगाने येथील नागरिकांची आर्थिक उन्नती असा प्रवास आता माझ्या उरलेल्या आयुष्यात मला करायचाय असा दादांचा दृढ निश्चय होता. दादांचे धाकटे बंधू माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजयआण्णा साबळे यांनी याकामी लक्ष घालून संगमेश्वर मंदीर परिसर चोहोबाजून सुशोभित करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केला आहे. याकामी त्यांना आपल्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष साथ दिली. या संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्री, दीपोत्सव यांसारखे विविध कार्यक्रम दरवर्षी होत असून माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर आहे.