रोहा कृषी अधिकारी व शेतकरी यांचा स्तुत्य उपक्रम
विश्वास निकम
गोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे अत्याधुनिक यांत्रिक पद्धतीने शेतामध्ये भात लागवड करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी रोहा यांच्या अंतर्गत मौजे चिल्हे येथील कृषिनिष्ठ शेतकरी रमेश (बाळा) महाडिक यांच्या शेतावर नवे उपक्रम म्हणून यंत्राच्या साहाय्याने भात लागवड करण्यात आली असल्याने रोहा तालुक्यातील कृषी अधिकारी व येथील प्रगतशील शेतकरी यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवत परिसरातील शेतकरी वर्गाला एक अनोखा उपदेश या माध्यमातून केला आहे.

सदरच्या भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन व नियोजन शेतकरी रमेश महाडीक व विभागीय कृषी सहाय्यक अधिकारी सारिका दिनेश दिघे सावंत व पर्यवेक्षक श्रीमती संडे यांनी केले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी परमेश्वर गाढे, प्रगत शेतकरी खरिवले, डॉ. श्याम लोखंडे, धनाजी महाडीक, प्राथमिक शाळा चिल्हेचे शिक्षक शरद पवार, रितेश खरिवले, स्वतः शेतकरी रमेश महाडिक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी नजिक असलेल्या जिल्हा परिषद शाळा चिल्हेच्या विद्यार्थ्यांनी देखील शेताच्या बांधावर जाऊन या यत्रांची पाहणी करत शिक्षकांनी व कृषी अधिकारी यांनी त्यांना माहिती दिली.
बदलत्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा व यंत्राद्वारे शेतात भात लागवड केल्याने वेळेची व खर्चाची बचत होते त्यामुळे पुढील काळात खरीपातच नव्हे तर रब्बी हंगामात देखील जास्तीत जास्त या यंत्राचा वापर शेतकरी बांधवानी आपल्या भागात करून सर्व शेती लागवडीखाली आणुयात तसेच आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच विविध पिकांची लागवड करणे गावागावातील शेतकरी संघटीत होऊन गट स्थापन करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी अधिकारी परमेश्वर गाढे यांनी यावेळी केले.
शेती कामांसाठी मजुरांचा तुटवडा असल्याने आर्थिकदृष्टया परवडणारे यंत्र या यांत्रिकीकरणाचा उत्तम फायदा शेतकऱ्यांना होतो. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा तसेच आधुनिक यांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी गट स्थापन करून शासनाच्या अवजारे बँकेचा लाभ घेत बदलत्या काळातील अवजारांचा व यांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच युवा पिढीने व महिलांनी देखील शेती व्यवसायात अधिक पुढाकार घेऊन आपली शेती सुजलाम सुफलाम करावी असे सांगितले.
तर शेतकरी रमेश महादेव महाडिक यांनी सांगितले की, वाढत्या महागाईत मजुरांची कमतरता शेतकऱ्यांना भासत आहे त्यात मजूरांची मनमानी, वाढती मजुरी ही बळीराजाला न परवडणारी आहे. त्यामुळे बदलत्या काळाचा विचार हा सर्व शेतकरी बांधवांनी केला पाहिजे. यासाठी शेतीसाठी उपयुक्त व शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आपण संघटीत होऊन गट तयार करायला हवा असे आवाहन यावेळी शेतकरी महाडिक यांनी केले.