• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लाखोंच्या दोन योजना तरीही गाव तहानलेले!

ByEditor

May 20, 2023

श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गावाची अवस्था; कंत्राटदार, अधिकारी मालामाल

संजय प्रभाळे
बोर्लीपंचतन :
श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गाव आजही तहानलेले आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे म्हणून ‘हर घर जल योजना‘ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शेखाडीत टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने, या योजनेतून नक्की अधिकाऱ्यांना फायदा झाला की कंत्राटदाराला हा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

शेखाडी गाव हे समुद्रलगत आहे. हे गाव कित्येक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करीत आहे. उन्हाळ्यात तर दरवर्षी टँकरने पाणी मागविले जाते. दहा हजार लिटर क्षमता असलेला टँकर मूळ गाव शेखाडी, समर्थवाडी व मोहल्ला या भागात तीन दिवसांत एकदाच येतो. त्यामुळे मिळेल ती भांडी भरून ठेवण्यासाठी महिलांची व ज्येष्ठ ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडते. दिवसा कोणत्याही वेळी टँकर येतो त्यामुळे दिवसभर वाट पहावी लागत असल्याचे गावातील महिला सांगतात. नुकत्याच राबवलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनेनुसार शेखाडी मूळ गावात 155 घरे, शेखाडी मोहल्ल्यात 82 तर शेखाडी समर्थवाडीमध्ये 33 घरे आहेत. शेखाडी गावच्या 270 घरांत साधारणपणे हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. या योजनेतून गावात एकूण 268 नळ जोडणी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहणी केली असता शेखाडी मूळ गावात घरोघरी नळच नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

चार वर्षांत लाखोंच्या योजना
शेखाडी गावात भारत निर्माणमधून 2018-19 मध्ये ३८ लाखांची पाणी योजना राबविली मात्र त्यातून पाणी टंचाई गेली नाही व नुकतीच गावात 62 लाखांची जलजीवन मिशन पाणी योजना राबवली तरीदेखील आम्हाला टँकरमधून पाणी मागवावे लागत असल्याचे गाव अध्यक्ष संतोष बांद्रे यांनी सांगितले. विशेष म्हणजे एकाच कंत्राटदाराला या दोन्ही योजनांची कामे दिली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

शासनाने पाणी योजना राबविल्या मात्र स्थानिक पातळीवर टँकरने पाणी आणावे लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे.

किशोरी केशव खापरे,
ग्रामपंचायत सदस्या

ग्रामस्थांना पाण्यासाठी खूप वणवण करावी लागते. आम्ही कार्ले धरणातून पाणी आणण्यासाठी मागणी करत आहोत. शासनाकडून दोन पाणी योजना राबविल्या पण गावात दीर्घकालीन पाण्याचा स्रोत व पाण्याची वर्षभरात गरज याचे नियोजन हे पूर्ण बिघडले.

बबन पाटील,
सरपंच, शेखाडी

अधिकारी मिटिंगमध्ये!
जिल्हा परिषदेच्या म्हसळा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता युवराज गांगुर्डे यांना फोन केला असता मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!