• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कर्जतमध्ये महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत साखळी उपोषण

ByEditor

Aug 12, 2024

गणेश पवार
कर्जत :
महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला कर्जत तालुक्यातील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कर्जत तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात गेले काही महिने विद्युत समस्येने नागरिक हैराण झाले होते. यामुळे संतप्त नागरिकांच्या भावना लक्षात घेत ॲड. कैलास मोरे यांनी पुढाकार घेतला. तर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीतून तालुक्यातील हजारो नागरिक एकत्र येत महावितरण कार्यालयावर २० जुलै रोजी मुक मोर्चा काढला होता. त्यावेळी तब्बत २१ मागण्यांबाबतचे निवेदन महावितरण अधीक्षक अभियंता आर. आर. माने आणि तत्कालीन उप अभियंता प्रकाश देवके यांना दिले होते.

मोर्चानंतर काही दिवसांनी कर्जत महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कर्जत वीज संघर्ष समितीला चर्चा करण्यासाठी बोलावणी केली होती. परंतु या चर्चेमध्ये अधिकारी वर्गाकडे ठोस अशा उपाय योजना नसल्याने अथवा वीज समस्या सोडविण्यासाठी अधिकारी वर्गाकडे इच्छाशक्ती नसल्यामुळे सदर चर्चा सकारात्मक न झाल्याने ती निष्फळ ठरली. अखेर वीज ग्राहक संघर्ष समितीने उपोषणाचा मार्ग स्विकारला. आज मोठ्या संख्येने नागरिक टिळक चौकात एकत्र येऊन सकाळी १० वा. बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात झाली.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी कर्जतमधील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. आजच्या उपोषणामध्ये ॲड. कैलास मोरे, ॲड. संदिप घरत, ॲड. चंद्रा चव्हाण, राजेश मिरकुटे, अस्मिता सावंत, हरेश सोनावळे, मल्हारी माने, ऋषीकेश भगत, विशाल कोकरे, राजेश इंगळे, शिवाजी शिंदे, रविंद्र क्षिरसागर, मुकेश पाटील, हेमंत बडेकर, कृष्णा पवार, दिलीप शिंदे, संतोष मुने, मनोज पाटील, तुषार वाडेकर, अजय ठमाले, अमोघ कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला आहे.

यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. गेली अनेक दिवस विजेच्या समस्यांबाबत नागरिक हैराण झाले आहेत. शहरी असेल ग्रामीण असेल या दोन्ही ठिकाणी विजेची समस्या कायम आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरण कुठे तरी कमी पडताना दिसत असल्याची भावना माजी आमदार लाड यांनी व्यक्त केली. मोर्चे, निवेदन आणि आंदोलन इथपर्यंतच सीमित न राहता विजेच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक व्यापक व्हावं लागेल असेही लाड पुढे म्हणाले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, मनसे नेते प्रवीण गांगल, माजी सभापती प्रदीप ठाकरे, वंचितचे जिल्हा अध्यक्ष दीपक मोरे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी सभापती पंढरीनाथ राऊत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बेमुदत साखळी उपोषणाला कर्जतमधील विविध सामाजिक संस्था, संघटना आणि विविध पक्ष संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!