अनंत नारंगीकर
उरण : महावितरणच्या दुर्लक्षामुळे उरणच्या पुर्व विभागात विजेचा सातत्याने खेळ खंडोबा सुरू झाला आहे. याचा नाहक त्रास येथील विद्यार्थी वर्गाला आणि सर्वसामान्य जनतेला बसत असून वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याच बरोबर यावर्षी ७ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या श्री गणेश चतुर्थी उत्सवाला अवघे २० दिवस शिल्लक राहिल्याने चिरनेर कला नगरातील मुर्तीकारागिरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

उरण तालुक्यातील पुर्व भाग विकसित होत चालला आहे. विविध कंपन्यांची गोदामे वसली आहेत. विजेचा वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजेचा वापर वाढत असताना मात्र सर्वसामान्य जनतेची दररोजची वीज गायब होऊ लागली आहे. कोणत्या ना कोणत्या भागामध्ये विजेचे फॉल्ट असल्याचे कारण पुढे करत वीज गायब होते. गेल्या वीस दिवसापासुन हे नित्यनियमाने सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तिन्ही वेळेत वीज गायब होत आहे. याचा अर्थ अधिकार्यांचे विजेच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे. याचा सर्वाधिक फटका उरण तालुक्याच्या पुर्व विभागाला बसत आहे. उरण पुर्व भागात येणारी वीज ही सुमार ७० ते ७५ किलोमिटर लांबीवर असलेल्या फिडरवरून आणली जाते. त्यात ही संपूर्ण वीजलाईन ही रस्त्यांच्या कडे-कडेने आलेली आहे. या रस्त्यांवर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्यामुळे रोज कुठेतरी एकतरी वाहन या वीजेच्या खांबाना धडकल्यामुळे वीज खंडीत होते. त्याचप्रमाणे उरण पुर्व भागात या वीज वाहिन्यांच्या खाली सर्वत्र भराव झाल्यामुळे वीज वाहिन्या जमिनीलगत खाली आल्या आहेत. एखादे वाहन किंवा काहीतरी अपघात होवून या वीज वाहिन्या तुटल्या जातात, त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होतो.
मागील काही दिवसांपासून रात्री अपरात्री वारंवार विज पुरवठा हा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा त्रास हा विद्यार्थी, नोकरदार नागरिक, व्यवसायिकांना सहन करावा लागत आहे. त्यात पावसाळा सुरू असल्याने डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच यावर्षी श्री गणेश चतुर्थी हा महत्त्वाचा सण ७ सप्टेंबर रोजी आल्याने सध्या चिरनेर कला नगरातील मुर्ती कारागिरांनी मुर्तीं घडविण्याकडे, रंगकाम करण्याकडे आपल लक्ष केंद्रित केले आहे. परंतु सातत्याने खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याचा सामना हा कला नगरातील मुर्ती कारागिरांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
तरी उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर आणि महावितरण कंपनीचे अति. कार्यकारी अभियंता संदिप चाटे यांनी दिघोडे येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या सबस्टेनच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरण पुर्व विभागातील रहिवाशी करत आहेत.