मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून टाकून दिले जाणारे घातक रसायन गावालगत असलेल्या नाल्यामध्ये सोडून देण्यात आले. या रसायनाचा पाण्याशी संपर्क आल्याने दुर्गंधी आणि वायू तयार झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली. अखेर याप्रकरणी महाड औद्योगिक परिसरातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुसगाव गावाजवळ काळ नदीच्या नाल्यामध्ये घातक रसायन सोडण्यात आले. यामुळे या रसायनाचा नाल्यातील पाण्याशी संपर्क येऊन हवेमध्ये वायू तयार झाला. यामुळे या परिसरातील नागरिकांना श्वसनाचा व मळमळ करण्याचा त्रास होऊ लागल्यानंतर ही खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर यांनी पोलीस ठाण्यात खबर देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली घातक रसायन सोडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये युवराज विठोबा जगताप (वय २७, रा. साकडी), राम सिताराम पाटेकर (वय ६१), नूर मोहम्मद काळसेकर (रा. कांबळे तर्फे महाड) या तीन जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २७२, २७९, २८०, २८६, ३(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड औद्योगिक परिसरातील अनेक नाल्यांमध्ये रात्रीच्या सुमारास अशाच प्रकारे घातक रसायने वारंवार सोडली जात असताना महाड औद्योगिक महामंडळाचे अधिकारी व प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मूग गिळून का गप्प बसतात? त्यांना महाडचा भोपाळ होऊन द्यायचा आहे का? असा सवाल महाड औद्योगिक वसाहत परिसरातील वीस गावांमधून उपस्थित केला जात आहे. मात्र, राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली वावरणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाच्या व प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या स्वास्थ्याबद्दल कोणतीही काळजी नसल्याने असे प्रकार वारंवार का घडत आहेत याची साधी चौकशी करण्याचे सौजन्य देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी दाखवत नसल्याने नाले प्रदूषित करणाऱ्या व त्यातून गडगंज संपत्ती कमावणाऱ्या आरोपी विरोधात कोणी कोणावर कारवाई करायची? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.