उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे १५ ऑगस्टचे उपोषण तूर्त स्थगित
वैशाली कडू
उरण : तालुक्यात सीआरझेड कायद्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली जात आहे. बोरी पाखाडी परिसरात शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भंगारवाल्यांनी आपले बस्तान बसविले आहे. त्यावर कारवाई होत नाही. तालुका भरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत त्यांच्या कडून पर्यावरणासह अनेक सरकारी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्या सर्वांवर कडक कारवाई करावी यासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शासकीय कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत आहे मात्र या कारावायाच होत नसल्याच्या निषेधार्थ उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उद्याच्या 15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक दिली होती. त्या अनुषंगाने उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी आज उरण तालुका मराठी पत्रकार संघाशी तातडीची बैठक घेतली.यावेळी सगळ्या समस्या नीट समजावून घेतल्या आणि या सर्व समस्यांवर ठोस कारवाई करण्याबाबत संबंधित सर्व कार्यालयाशी लवकरच पत्रव्यवहार करणार असल्याची ग्वाही तहसिलदार उद्धव कदम यांनी दिली आहे. त्यामुळे उद्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजीचे उपोषण तूर्त स्थगित करण्याचा निर्णय उरण तालुका मराठी पत्रकार संघाने घेतला आहे.

या बैठकीला उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर व दिलीप कडू, सरचिटणीस अजित पाटील, कार्याध्यक्ष संजय गायकवाड, सदस्य प्रवीण पाटील, प्रवीण कोलापटे, सुयोग गायकवाड, पूजा चव्हाण या सदस्यांसह केगाव् विभागाच्या तलाठी, तहसील कार्यालयातील काही अधिकारी उपस्थित होते.
उरण तालुक्यात अनेक ठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. तालुक्यात केगाव दांडा परिसरासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. विशेषत: केगाव दांडा परिसरात तर कांदळवनांवर मोठ्या प्रमाणात समुद्र भरती रेषेला लागून भराव करण्यात आला आहे. गुरचरणाच्या जागेवर एक भली मोठी सुमारे शंभर खोल्यांची इमारत बांधली जात आहे, मात्र त्यावर कारवाई केली जात नाहीय. यावर कारवाई व्हावी अशी उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी आहे. तसे पत्र देखील उरणच्या तहसीलदारांना यापूर्वीच दिले आहे. मात्र त्यावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे पत्रकार संघाने या विरोधात उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने कालच पत्रकार संघाला रीतसर पत्र पाठवून तहसीलदारांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उरणच्या पत्रकारांनी सीआरझेड कायद्याची तालुका भरात कशी पायमल्ली होत आहे याची अनेक उदाहरणासह तहसीलदारांना माहिती दिली. तालुक्यात काही कंटेनर यार्ड देखील सीआरझेड कायद्याची मोडतोड करीत आहेत. त्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी लावून धरली आहे. बोरी पाखाडी सारख्या ठिकाणी सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भंगार वाल्यांनी आपले बस्तान बसविले आहे. त्या ठिकाणी काही खोल्या भाड्याने दिल्या जातात ज्या ठिकाणी कोणीही पर प्रांतीय लोकं येऊन अवघ्या 15 ते 20 दिवसांसाठी येऊन राहून जात आहेत अशा लोकांकडून उरण तालुक्यात घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास तालुका बेचिराख होण्याचा धोका देखील पत्रकारांनी यावेळी बोलून दाखविला.
तालुक्यात कोणत्याही कंटेनर यार्डने पर्यावरणाची राखण करण्याच्या निमित्ताने आपल्या यार्डाच्या जागेपैकी 30 टक्के जागेवर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केलेले नाहीय त्यामुळे उरण तालुक्यात पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. तालुक्यातील सर्व कंटेनर यार्डावर काही किलोमीटर रुंदीचे लांबीचे रस्ते वृक्षारोपण साठी दत्तक देण्याची गरज आहे तसे केल्यास संपूर्ण उरण तालुका हिरवेगार होईल याची शास्वती देखील पत्रकारांनी तहसीलदारांना दिली. पत्रकारांनी अतिशय पोट तिडकीने मांडलेल्या सर्व प्रश्नांवर ठोस उपाय योजना करण्याचे आश्वासन तहसीलदार उद्दव कदम यांनी दिले असून त्यांनीच पत्रकारांचे आंदोलन स्थगित करावे अशी मागणी केल्याने पत्रकारांनी उद्याच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेले आंदोलन कारवाई होण्याचे आश्वासन मिळाल्याने स्थगित करण्यात आले आहे.