• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना जोडे मारो आंदोलन

ByEditor

Aug 20, 2024

महायुतीत तणाव; भाजप आक्रमक

गणेश पवार
कर्जत :
मुंबई गोवा महामार्गावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजप नेतृत्व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली. यावर भाजप आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. कर्जत मध्ये आज भाजपने रामदास कदम यांचा निषेध करत जोडे मारो आंदोलन केले आहे. तर भाजपने लोकसभेत प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळत काम केले. मात्र अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य कराल तर रायगडमधील शिंदे गटाच्या तीनही जागांवर भाजपचा उमेदवार उभा करू असा इशारा देत भाजपने दंड थोपटले असल्याच पाहायला मिळत आहे. दरम्यान यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला असून युतीत मिठाचा खडा पडला असल्याच चित्र आहे.

मुंबई गोवा महामार्गाच काम गेले अनेक वर्षे सुरूच आहे. आजवर हे काम पूर्ण होऊ शकलेल नाही. अशात खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या महामार्गाची पाहणी करून रस्ता लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, तरीही त्यांनी देखील संसदेत या रस्त्यावरून हात टेकले. दुसरीकडे राज्याच्या विधानसभेत या महामार्गावरून चेष्टा करण्यात आल्याची बाब घडली होती. तर दुसरीकडे आता सागरी मार्गाचा आग्रह धरत मुंबई गोवा महामार्ग केला जात आहे. असे असले तरी या नव्या रस्त्याचा कोकणी माणसाला फायदा नाही. तर कोकणच्या विकासाची लाइफलाईन असलेला मुंबई गोवा महामार्ग हा दुर्लक्षित राहिला असल्याच एकंदर चित्र आहे. अशात आता याच महामार्गाच्या रखडपट्टीवरून राजकीय खरडपट्टीला उत आला असल्याच चित्र आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना कुचकामी मंत्री म्हटलं. यासह त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचीही थेट मागणी केली. प्रभू रामचंद्रांचा वनवास १४ वर्षांनी संपला, मात्र मुंबई- गोवा या रस्त्याचा वनवास काही संपत नाही. या मार्गाची अवस्था खूप वाईट आहे. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, असा सवाल करत रामदास कदमांनी टीका केली. यावरून आता कोकणात भाजप आक्रमक झाली आहे.

कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात आज भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र जमत रामदास कदम यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. रामदास कदम हे स्वतः १५ वर्ष मंत्री असताना त्यांनी काय केल ? मुंबई गोवा महामार्गासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही. तर आता लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच मतदारसंघात महायुतीचा उमेदवार पिछाडीवर होता. मात्र सबंध कोकणात रवींद्र चव्हाण यांचा जनाधार वाढता आहे. तर चव्हाण यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष वाढत आहे. अशात कदम यांच्या मुलासाठी राजकीय असुरक्षितता निर्माण झाल्याने ते धास्तावले असल्याने चव्हाण यांच्यावर बोट थ्व्ण्याचा प्रयत्न करत असल्याचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे यांनी सांगत कदम यांचा निषेध केला. तर केंद्राकडे असलेल्या रस्त्यावर स्वतः रवींद्र चव्हाण यांनी लक्ष देऊन तो रस्ता लवकर होण्यासाठी प्रयत्न केले. असे असताना रामदास कदम हे त्यांच्यावर आरोप करत असतील तर युतीचा धर्म काय फक्त भाजपने पाळायचा का ? असे म्हणत कोकणासह कर्जत मतदारसंघात शिंदे गटाच्या जागेवर भाजप उमेदवार उभा करून निवडून आणेल असा जळजळीत इशारा भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी दिला.

यावेळी रामदास कदम हाय हाय, निम का पत्ता कडवा है, या रामदास कदमच करायचं काय, खाली डोकं वर पाय म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निषेध नोंदवत रामदास कदम यांचा फोटो असलेल्या फलकावर चपला मारत, त्यावर पाय दिला. याप्रसंगी भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, चिटणीस मंगेश म्हसकर, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, संदीप म्हसकर, नरेश मसने, किशोर ठाकरे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, महिला मोर्चा सरचिटणीस मृणाल खेडकर, महिला तालुकाध्यक्ष नम्रता कांदळगावकर, शर्वरी कांबळे, बिनिता घुमरे, युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर, सर्वेश गोगटे, प्रवीण बोराडे, आदींसह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होत

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!