शशिकांत मोरे
धाटाव : तापमानातील वाढ ही वैश्विक समस्या निर्माण झाली आहे. झाडे लावणे हे यावरील रामबाण औषध असल्याचे लक्षात घेऊन वृक्षारोपण ही काळाची गरज समजून सत्यवार्ता प्रतिष्ठानच्या माध्यमातून कापुरांच्या झाडांचे रोपण करण्यात आले. स्वामी समर्थ मठ परिसरात कापुराची झाडे लावण्यात आल्याने या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरल्याचे पहावयास मिळत आहे.
कर्जत तालुक्यातील मोगरज या गावातील स्वामी सहवास श्री स्वामी समर्थ मठ परिसरात सत्यवार्ता प्रतिष्ठानच्या माध्यमातून कापुराची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष बालाजी महाराज, सेक्रेटरी राजेंद्र ढमाले, वृक्ष लागवड व संवर्धन समितीचे अध्यक्ष नामदेव दिवेकर, प्रमुख कार्यवाह धनंजय जगताप, शास्त्रज्ञ धनश्री जगताप, बापू कदम, लक्ष्मी नकाशे, श्वेता कदम, अखिलेश मण्डल, समीर बिडवई, माजी सरपंच बाबू भुजाडे, अनंत पादिर आदी स्वामी भक्तांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली; परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले.याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. मानवाने आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेसाठी सिमेंटची जंगलं वसवली. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याच्याच परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत असल्याचे मत कोषाध्यक्ष बालाजी महाराज यांनी व्यक्त केले. तर वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढलीय. जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय.शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात, म्हणूनच वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे, त्यांचे संवर्धन करा असे समितीचे अध्यक्ष नामदेव दिवेकर म्हणाले.