जोपर्यंत मुख्यमंत्री भेट देऊन लेखी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच, आक्रोश समितीचा निर्धार
सलीम शेख
माणगाव : १७ वर्ष रखडलेल्या कोकण वासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत महामार्ग जनआक्रोश समिती आक्रमक झाली असून माणगाव नवीन बस स्थानक याठिकाणी आज गुरुवार, दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून समितीचे अध्यक्ष अजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आपले आमरण उपोषण सुरु केले असून या उपोषणाला विविध संघटना, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच कोकणवासीय यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री उपोषणठिकाणी भेट देऊन लेखी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आला आहे. या उपोषणाला महामार्गाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत समितीचे पदाधिकारी सुरेंद्र पवार, रुपेश दर्गे, संजय जंगम यांनी ठाम उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाचा हा प्रश्न केवळ जनआक्रोश समितीचा नसून सबंध कोकणवासीयांचा असून हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्व कोकणवासियांनी या उपोषण आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान समितीतर्फे करण्यात आले आहे.

या समितीला जाहीर पाठिंबा देणारे स्वराज्यभूमी आंदोलन व समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव, समितीला कुणबी समाज समन्वय समिती रायगड जिल्हा,माणगाव व्यापारी असोसिएशन,रिक्षा संघटना माणगाव,रामनवमी उत्सव समिती,मावळा प्रतिष्ठान,बजरंग दल यांच्यासह विविध संघटना, लोकप्रतिनिधींचा जाहीर पाठिंबा दिला असून जिव्हाळ्याच्या या प्रश्नाबाबत कोकणवासीय आता आक्रमक झाले आहेत. माणगाव नवीन बस स्थानक येथे गुरुवारी महामार्गाच्या या रखडलेल्या कामाबाबत जनआक्रोश समितीतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणाला कोकणवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. माणगाव तालुक्यातील विविध संघटना, विविध गावांनी हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एकएकदिवस बसण्याचे निश्चित केले आहे.
या महामार्गाचे काम दीर्घकाळ रखडल्याने आता या उपोषणाच्या माध्यमातून कोकणवासियांचा आक्रोश व संताप पाहायला मिळत आहे. या उपोषणात स्वराज्यभूमी आंदोलन व समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव, ज्येष्ठ नेते महादेव बक्कम, माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, रिक्षा संघटनेचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआण्णा साबळे, नथुराम बामणोलकर, सुधीर सोनावणे, संतोष रणपिसे आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते, कोकणवासीय सहभागी झाले होते.
यावेळी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय जाधव म्हणाले कि, कोणतेही काम करताना एक यंत्रणा असते. मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाबाबत सरकार व ठेकेदार यांना समर्पकपणे उत्तर देता येत नाहीत. गूढ रहस्य झाल्यासारखे महामार्ग झाला आहे. मध्यंतरी सांगितले जात होते भुसंपादनाचा अडथळा आहे त्यानंतर सांगितले जाते. भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मग आता या महामार्गाचे काम का रखडले आहे? १७ वर्ष हे काम रखडल्याने कोकणवासियांची सहनशीलता आता संपली आहे. आम्ही या प्रश्नाबाबत अनेकदा सरकारला निवेदने दिली असून शांततेच्या मार्गाने आंदोलने केली आहेत. आता आम्हाला सरकारकडून हे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याबाबत लेखी आश्वासन पाहिजे असल्याचे ते म्हणाले. या प्रश्नाबाबत समितीला पाठिंबा देणारे स्वराज्यभूमी आंदोलन व समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव म्हणाले कि, १२ वर्षे झाली तरी माणगाव बायपासचा काम पूर्ण होत नाही. संपूर्ण महामार्गाशी आज अत्यंत दैनी अवस्था झाली आहे. या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली असून त्याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. जोपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणातील दुसरीमार्गाचे काम सुरु करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार म्हणाले कि, या प्रश्नाबाबत लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या महामार्गाच्या रखडलेल्या कामाला कोकणातून निवडून गेलेले लोक प्रतिनिधीच जबाबदार आहेत. कोकणचे भाग्य विधाते म्हणून समजणाऱ्यांनी हे काम होत नसल्याने राजीनामा दिला पाहिजे. स्वातंत्र्याच्या दिवशी या प्रश्नासाठी जनतेला आंदोलन बसावे लागते यापेक्षा दुर्दैव कोणते? असा सवाल करीत आपल्या लाडक्या बहिणीची या रस्त्याने जाताना रक्षण कसे होईल हे सरकारने पाहावे असा घणाघात त्यांनी केला. उपोषणकर्ते समितीचे सचिव रुपेश दर्गे यावेळी बोलताना म्हणाले कि, १७ वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले असल्याने आता खऱ्या अर्थाने कोकणवासीयांचा उद्रेक झाला आहे. जोपर्यंत या कामाबाबत आम्हाला ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नासाठी आमचा लढा हा प्रश्न सुटेपर्यंत सुरूच राहणार असून कोकणवासीयांनी याकरिता एकजुटीने या सामाजिक प्रश्नासाठी लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे ते म्हणाले.