महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष सन्मानपत्र देऊन केले सन्मानित
अब्दुल सोगावकर
सोगाव : मान्सून २०२४ मध्ये २३ जून रोजी मूनवली येथील तलावात दोन किशोरवयीन मुले पोहत असताना बुडाली होती, या आपत्तीमध्ये अत्यंत सचोटीने व तत्परतेने शोध व बचाव कार्य सुरु केल्याबद्दल तसेच या आघाताने बाधीत झालेल्या बांधवांना तात्काळ मदत मिळवून दिली. यासोबतच शिवराज्याभिषेक सोहळा, शासन आपल्या दारी अशा महत्त्वाच्या विविध कार्यक्रमांमध्ये गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रशंसनीय भुमिका बजावल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या माध्यमातून
आपत्ती व शासकीय व विविध सामाजिक कार्यात आपदा मित्र म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन हरिश्चंद्र घाडी यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ‘विशेष सन्मानपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे सर्वस्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी जणू समाजसेवेचे व्रत घेतले असल्याचे त्यांच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण बचाव, आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध विषयांवर मनोबल वाढवणारे शिबिरे व विविध प्रकारचे राबवित असलेले उपक्रम व इतर कार्यक्रमावरून दिसून येत आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक शैक्षणिक, आरोग्य, राजकीय, सामाजिक संस्था तसेच वृत्तसंस्था यांनी वेळोवेळी दखल घेऊन विविध पुरस्कार दिले आहेत. त्यांना यापूर्वी भाई जगताप मित्रमंडळ रायगड व काँग्रेस सेवा फाऊंडेशन रायगड आणि मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट रायगड तर्फे शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच पनवेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘आदर्श सामाजिक कार्यकर्ता’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच मुंबई येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ पातळीवर कार्यरत असणारे विविध नेतेमंडळी यांच्या हस्ते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.