• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्ह्यातील ५४ जलविद्युत प्रकल्प रखडले?

ByEditor

Aug 16, 2024
रायगड जिल्ह्यातील रखडलेला महत्त्वकांक्षी काळ जलविद्युत प्रकल्प.

मागील दहा वर्षापासून रखडले प्रकल्प

लोकप्रतिनिधींची मानसिकता कारणीभूत

मिलिंद माने
महाड :
मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा निसर्गाचे मुबलक वरदान, ऐतिहासिक गड किल्ले, मनाला मोहविणारे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आणि गर्द वनराईने नटलेले माथेरान सारखा प्रदेश, जिल्ह्यातील महाड, माणगाव ,रोहा, पनवेल, खोपोली, पेण येथील औद्योगिक वसाहती आणि रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात ३००० मिलिमीटरपर्यंत होणारी पर्जन्यवृष्टी पाहता या ठिकाणी ५४ जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतात, मात्र शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मानसिकता जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये नसल्याने मागील दहा वर्षापासून प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला अद्याप हिरवा झेंडा मिळाला नसल्याचे उघड झाले आहे.

रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१६२ चौरस किलोमीटर असून राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यापैकी रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे. रायगड जिल्हा १७.५१ अंश उत्तर ते १९.८० अंश उत्तर अक्षांश आणि ७२.५१ अंश पूर्व ते ७३.४० अंश पूर्व रेखांश यामध्ये विस्तारलेला आहे. जिल्ह्याची पूर्वेकडील सीमा सह्याद्री पर्वताच्या लहान मोठ्या रांगांनी वेढलेली असून त्याला लागून पुणे जिल्ह्याची हद्द आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून दक्षिणेस असलेल्या सावित्री नदीने रत्नागिरीपासून रायगड जिल्ह्याची दक्षिण सीमा निश्चित केलेली आहे. आग्नेय दिशेला सातारा, उत्तरेला ठाणे, वायव्येला मुंबई हे रायगड जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे आहेत. जिल्हा मुख्यालय अरबी समुद्रालगत अलिबाग शहर असून मुंबईपासून ११५ किलोमीटर अंतरावर आहे. रायगड जिल्ह्याचे हवामान उष्ण व दमट असून किमान तापमान १६ अंश सेल्सियस व कमाल ४२ अंश सेल्सिअस इतके असते. रायगड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ३१४२.८३ मिलिमीटर इतके आहे. परंतु २००५ मधील पावसाची सरासरी ३९१३ मिलिमीटर होती.

रायगड जिल्ह्यातील रखडलेला महत्त्वकांक्षी काळ जलविद्युत प्रकल्प

रायगड जिल्ह्याचे शेतीलायक क्षेत्र ३,१३,००४ हेक्टर आहे तर लोकसंख्येचे प्रमाण २६८.०० प्रति चौरस किलोमीटर आहे. रायगड जिल्ह्यात ७० टक्के भागात ९.२७% नाचणी व ४.०० टक्के वरी, तर १६.७३% इतर पिके घेतली जातात. रायगड जिल्ह्यात बाळगंगा हा मोठा प्रकल्प १, मध्यम प्रकल्प ८, लघु प्रकल्प स्थानिक स्तर १६, लघु प्रकल्प १०१ ते २५०. हेक्टरमधील ५२, ० ते १०० हेक्टर मधील १६, पाझर तलाव ८०, कोकण पद्धतीचे बंधारे 101 ते 250 हेक्टर ७, वळवणी बंधारे १३, साठवण तलाव 45 असे प्रकल्प कार्यान्वित आहेत.

रायगड जिल्ह्यात उल्हास खोरे पोशीर व शिलार यामध्ये पूर्ण कर्जत तालुका येतो. 9.91% भाग उल्हास खोऱ्यामध्ये आहे तर ७०८७६३ हेक्टर क्षेत्र उल्हास खोऱ्यात येते. सावित्री खोरे – काळ, गांधारी, कामठी, चोळई, नागेश्वरी. यामध्ये महाड तालुका, पूर्ण माणगाव तालुका, बहुतांशी पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, रोहे तालुका अंशतः समाविष्ट होतात. रायगड जिल्ह्यातील ३६.५९ टक्के भाग २६१६९१७ हेक्टर क्षेत्र सावित्री खोऱ्यात येते. पाताळगंगा खोऱ्यामध्ये पनवेल, उरण तालुके, पूर्ण खालापूर, पेण तालुका अंशतः यामध्ये येतात. रायगड जिल्ह्यातील १३.६८ टक्के भाग पाताळगंगा खोऱ्यात येतो. अंबा खोऱ्यात अलिबाग व सुधागड तालुका बहुतांशी, खालापूर, पेण, रोहा तालुका अंशतः यामध्ये येतात. रायगड जिल्ह्यातील १०.७७ टक्के क्षेत्र ७७०२७० हेक्टर क्षेत्र कुंडलिका खोऱ्यात येते. कुंडलिका नदीच्या खोऱ्यात अलिबाग, माणगाव, रोहा तालुका बहुतांशी, सुधागड व मुरुड तालुके पूर्णतः यामध्ये रायगड जिल्ह्यातील १२.०१ टक्के भाग ८५८९५५ हेक्टर क्षेत्र कुंडलिका खोऱ्यात येते.

रायगड जिल्ह्यात उल्हास पाताळगंगा आंबा कुंडलिका व सावित्री या पाच प्रमुख नद्या असून रायगड जिल्ह्यात 1909 गावे असून 43 गावे आदिवासी क्षेत्रामध्ये समाविष्ट केलेली आहेत. या 43 गावांचे क्षेत्रफळ 300 चौरस किलोमीटर आहे.

रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात रखडलेले जलविद्युत प्रकल्प पुढील प्रमाणे :

काळ (ता. महाड) – १५ मेगावॅट
कुंभे (ता. माणगाव) – १० मेगावॅट

तर खाजगीकरण अंतर्गत प्रस्ताविक ५२ प्रकल्पांची नावे पुढीलप्रमाणे :

कुंडलिका (ता. रोहा) – ४.५० मेगावॅट (करारनामा झालेला आहे)
हेटवणे (ता. पेण) – ५०० मेगावॅट
गांजवणे (ता. पोलादपूर) – ६.५० मेगावॅट
गुगलशी (ता. महाड) – ८.०० मेगावॅट
भालगाव (ता.मुरुड) २.०० मेगावॅट
कसबे शिवतर (ता.महाड) – ५.०० मेगावॅट
कदम पाडा (ता. महाड) – २.५० मेगावॅट
कडवट (ता. महाड) – ४.०० मेगावॅट
नागशेत (ता. महाड) – २.०० मेगावॅट
भांबुर्डा (ता. महाड) – ९.६५ मेगावॅट
ऊनर्ज (ता. महाड) – १.५० मेगावॅट
दीपट (ता. महाड) – ७.०० मेगावॅट
बोरघर (ता. महाड)
घोटेवाडी (ता. महाड) – २.०० मेगावॅट
ठाकूरवाडी (ता. कर्जत) – १.५० मेगावॅट
आरकवाडी (ता. कर्जत) – १.२५ मेगावॅट
घोणसे (ता. म्हसळा) – २.०० मेगावॅट
पांगळोली (ता. म्हसळा) – १.०० मेगावॅट
कोंढाणे (ता. माणगाव) – २.०० मेगावॅट
गांधारी (ता. महाड) – ४.०० मेगावॅट
नसरापूर (जि. रायगड) – ०.९० मेगावॅट,
धामणी (जि. रायगड) – ११.०० मेगावॅट
आंबेघर (जि. रायगड) – १०.०० मेगावॅट
भाग्याचीवाडी (ता. कर्जत) – ०.२० मेगावॅट
बोंडशेत (ता. कर्जत) – ०.२० मेगावॅट
मार्गवाडी (ता. कर्जत) – ०.४५ मेगावॅट
बिडीस वाडी (ता. कर्जत) – ०.२० मेगावॅट,
सालपे (ता. कर्जत) – ०.२० मेगावॅट
धाक (ता. कर्जत) – ०.२० मेगावॅट
धनगर वाडी (ता. सुधागड) – ०.२० मेगावॅट (या प्रकल्पाचा करारनामा झालेला आहे.)
दुधानी (ता. पनवेल) – ०.२० मेगावॅट
दासगाव (ता. महाड) – ०.२० मेगावॅट
गोकुळवाडी (जि. रायगड) – १.०० मेगावॅट
नारवेड (जि. रायगड) – १.०० मेगावॅट
घोटी (जि. रायगड) – ०.५० मेगावॅट
लामशेवाडी (जि. रायगड) – ०.५० मेगावॅट
मगरूम (जि. रायगड) – ०.७५ मेगावॅट
गडबड (जि. रायगड) – ६.०० मेगावॅट
सय्यदगिरी (जि. रायगड) – ९.०० मेगावॅट
पाचापूर (जि. रायगड) – १.०० मेगावॅट
खांडपोली (जि. रायगड) – २.५० मेगावॅट
राजेवाडी (जि. रायगड) – २.५० मेगावॅट
कारवनी (जि. रायगड) – १.०० मेगावॅट
केळेवाडी (जि. रायगड) – २.५० मेगावॅट
सुतारवाडी (जि. रायगड) – ७.०० मेगावॅट
शरातेवाडी (जि. रायगड) – ७.०० मेगावॅट
सोंडेवाडी (जि. रायगड) – ३.५० मेगावॅट
पोटेवाडी (जि. रायगड) – १.०० मेगावॅट
पितळवाडी (जि. रायगड) – ७.५० मेगावॅट
विन्हेरे (जि. रायगड) – १.०० मेगावॅट
गरतेवाडी (जि. रायगड) – ६.०० मेगावॅट
गोमाशी (जि.) – ११.०० मेगावॅट

या ठिकाणावरून पावसाळ्यात नदीद्वारे वाहणाऱ्या जोरदार प्रवाहामुळे व काही ठिकाणी असणाऱ्या पाझर तलाव व साठवण तलावातून व लघुपाटबंधारे प्रकल्पातून शेतीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याद्वारे वीज उत्पन्न होऊ शकते.

सर्वच पक्ष मागासलेल्या कोकणाचा अनुशेश भरून काढण्याच्या बाता मारत असले तरी ज्या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले, त्यावर २०० कोटी १२ लाख ३७ हजार रूपये खर्च झाले असा कुंभे प्रकल्प ३० टक्के राहिलेल्या कामामुळे धूळ खात पडला आहे. कोकणात मुबलक प्रमाणात पाऊस पडतो मात्र पावसाचे सर्व पाणी समुद्रास जाऊन मिळते. पण हेच पाणी अडविले तर प्रदूषण विरहीत जलविद्युत प्रकल्पामुळे कृषी व उद्योगाला वीज व पाणी मिळेल मात्र कोकणातील लोकप्रतिनिधींची मानसिकता कोकण विकासाची नसल्याने आज हे सर्व प्रकल्प रखडले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!