• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पन्नास टक्के लाडक्या बहिणी लाभापासून वंचित!

ByEditor

Aug 24, 2024

लाडक्या बहिणींची बँकेत फेऱ्या मारून होते हेळसांड!

तणाव कमी करण्यासाठी पैसे बँकेत जमा झालेल्या लाडक्या बहिणींची यादी नोटीस बोर्डवर लावा; महिलांची मागणी

विश्वास निकम
कोलाड :
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत दरमहा महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये रक्षाबंधन आधी पहिला हप्ता ओवाळणी म्हणून जमा होणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आणि पन्नास टक्के महिलांच्या खात्यात दोन महिन्याचा हप्ता ३००० रुपये जमा झाले. परंतु अजूनही कोलाड, खांब परिसरातील पन्नास टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यांची बँकेत पैसे जमा झाले कि नाही हे पाहताना हेळसांड होताना दिसत आहे. ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बँकेत जमा झाले आहेत अशा महिलांची यादी बँकेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावी, यामुळे ज्यांचे पैसे बँकेत पैसे जमा झाले नाहीत त्यांना रांगेत उभे न रहाता घरी जाता येईल व यामुळे बँकेतील गर्दीही आपोआप कमी होईल अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे.

या परिसरातील महिला या अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या असुन या महिलांना बाजापेठेच्या ठिकाणी असलेल्या बँकेत आपले पैसे जमा झाले कि नाही हे पाहण्यासाठी २० ते २५ किलोमीटर अंतरावरून पायपीट करावी लागते व बँकेत येऊन तासनतास रांगेत उभे राहून वाट पाहावी लागत आहे. यासाठी कोणाची केवायसी झाली नाही तर कोणाचे बँक खाते बंद झाले असेल तर ते पुन्हा उघडण्यासाठी नवीन कागदपत्र जमा करावे लागत आहेत. यामुळे ऊन पावसाची तमा न बाळगता सर्व महिलांना उपाशीपोटी बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.

अंगणवडी सेविका तसेच मोबाईलवर लाडक्या बहिणींचे ऑनलाईन फार्म भरले व ते सक्सेस झाले. परंतु, असे असताना लाडक्या बहिणींना बँकेत घिरट्या घालाव्या लागत आहेत. ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज काही कारणानं बाद झाले आहेत याचे कारण शोधण्यासाठी लाडक्या बहिणींची हेळसांड होत आहे. यामध्ये बँकेतील कर्मचारी वर्गाची कामे वाढली असल्याचे दिसून येत आहे. गणेश उत्सव काही दिवसांवर आला असुन व्यापारी वर्ग माल खरेदी करण्यासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करीत असुन, खातेदारही पैसे काढण्यासाठी गुंतले आहेत. यामुळे बँकेत गर्दी होत असुन शासनाने लाडक्या बहिणींसाठी वेगळे कर्मचारी नेमणे जरुरीचे आहे. यामुळे सर्वच जनतेची गैरसोय होणार नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!