नागोठणे येथील गु. रा. अग्रवाल विद्यामंदिरात डॉ. मिलिंद धात्रक यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन
प्रतिनिधी
नागोठणे : महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजना आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी हा विषय संपूर्ण राज्यभरात विद्यार्थी, पालक आणि समाजात चिंतेचा बनला आहे. राज्यभरात दिवसेंदिवस गंभीर आणि माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगाने नागोठणे येथील गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक यांना नागोठणे गावाचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. मिलिंद धात्रक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात शाळा व परिसरात विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि तक्रारींसाठी शाळेत तक्रार पेटी बसविणे, विद्यार्थींच्या सुरक्षेसाठी शाळेत विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करणे, शाळेत मुलींच्या सुरक्षेकरीता महिला शिपाई नियुक्ती करावी, शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि विशेषतः मुलींचे लैंगिक शोषणासारखा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेने योग्य ती सर्व काळजी घ्यावी अशा मागण्या वजा सूचना करण्यात आल्या आहेत.
यावेळी नागोठणे ग्रामपंचायत उपसरपंच अखलाक पानसरे, सामाजिक कार्यकर्ते अशफाक पानसरे, ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, शिवसेना शाखाप्रमुख धनंजय जगताप, अनिल महाडिक, जितेंद्र जाधव, सतीश पाटील, अंकुश जैन, पंकज कामथे, रुपेश जगताप उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना तसेच शासकीय आदेश आणि परिपत्रके यांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि शाळेतील महिला कर्मचारी यांचीही सुरक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.