मुंबई : राज्यभर एसटीचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची बुलडाणा येथे बैठक पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी येत्या 3 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे संकेत आज बैठकीत देण्यात आले. 3 सप्टेंबरनंतर गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होत आहे. परिणामी ऐण सनासुदीत प्रवाशांचे हाल होणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिका-यांनी दिला आहे.
या आंदोलनाविषयी बोलताना कृती समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळाचा आशिया विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही कृती समिती तयार झाली आणि २०१६ पासून आमची मागणी राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतानाच त्यांनी कामगारांनाही न्याय द्यावा. वेतन आयोगाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यकाळ जाहीर करून वेतनाप्रमाणे वेतनवाढ करावी, अन्यथा एसटी कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून 3 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन छेडतील, असे संकेत त्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली.