मुंबई : महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. महिलांवार अत्याचार वाढत आहे. आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं महाराजांचा पुतळा कोसळला. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. जोरदार वाऱ्याने राज्यापालांची टोपी कधी उडाली नाही. महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केला आहे. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
कोकणवासियांना आता कळलं असेल स्मारकारच्या कामात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालाय. पुतळा उभारण्याचे टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार आहेत. जे मालवणला रस्ता आडवून बसले ते शिवद्रोही होते. शिवद्रोही आडवे आलेत. हे इतके मस्तवाल झाले की, कोणतीही भीडभाड न बाळगत नाही त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसले आहे. किल्ल्यावर रस्ता अडवणारे मोदी, शाहांचे दलाल आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
रविवारी गेट वे ऑफ इंडियाला जोडे मारो आंदोलन
महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चा काढला तिथे रस्ता मोदी शाह यांच्या दलालांनी अडवला. हा पुतळा पडला कसा? केसरकर जे बोलतायत ते संतापजनक आहे. येत्या रविवारी दुपारी हुतात्मा स्मारकहून गेट वे इंडियापर्यंत जाणार आहोत. जोडे मारो आंदोलन आम्ही करत या सरकारचा निषेध करणार आहोत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पुतळ्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची : शरद पवार
शरद पवार म्हणाले, पुतळ्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची आहे. ते नाकारू शकतं नाही. पुतळ्याच्या उद्घाटनासाठी प्रामुख्यानं राज्य सरकारचे प्रतिनिधी तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या ठिकाणी होते. त्यामुळे जबाबदारी राज्य सरकारची आहे. एका भगिनीला त्रास देण्यात आला होता त्यावेळी शिवाजी महाराज यांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले होते. आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकरण करतं नाही. कुणी सांगत आहे की वाऱ्याचा वेग जास्त होता त्यामुळे पुतळा पडला, परंतु ज्या ठिकाणी पंतप्रधान गेले तिथं किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार खोलवर गेला आहे. या सरकारबद्दल जनतेच्या मनात चीड आहे, असेही शरद पवार म्हणाले.
महायुती सरकार कमीशनखोर : नाना पटोले
महायुती सरकार कमीशनखोर आहे. जेव्हा पुतळ्याचे अनावरण केलं जात होतं त्यावेळी प्रोसिजर फॉलो केली गेली नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे काम केलं गेलं. मुख्यमंत्री म्हणतायेत की यापेक्षा मोठा पुतळा करू…अरे पण तुम्ही जे पाप केलं त्याचं काय? महाराष्ट्रमध्ये महिला सुरक्षित नाही. रश्मी शुक्ला राजकारण करत आहेत. आरएसएसचा अजेंडा चालवत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.