अमूलकुमार जैन
बोर्ली मांडला : विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी, रायगडचे अध्यक्ष प्रदिप परशुराम ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हयातील परळी येथील जरीन खान नावाच्या संशयीत व्यक्तीचा पोलीस मारहाणीत मृत्यु झाला. गेल्या काही महिन्यात घडलेली परळी येथील दुसरी घटना असल्याचे बोलले जाते. जळगांव जिल्हयातील अमळनेर येथील मुस्लिम युवकाचा पोलीस कस्टडी रिमांड काळात झालेला मृत्यु व राज्यात मागास घटकासह अल्पसंख्यांक मुस्लिम तरुणांना स्टेटस सारख्या गोष्टीचे भांडवल करुन लक्ष केल्या जात आहेत व अनेक ठिकाणी मारहाण करण्याच्या व जीवानिशी मारण्याच्या घटना घडत आहेत.
अक्षर भालेराव या वंचित आघाडीचा पदाधिकारी असलेल्या बौध्द युवकाची नांदेड जिल्हयातील बोंढार या गावी दि. १ जुन २०२३ रोजी जातीयवादातून निर्धुन हत्या करण्यात आली आहे. त्या गावातील जातीय तणाव दूर व्हावा आणि सामाजिक सलोखा राखून संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीने सर्व प्रयत्न केले आणि भिमजयंती साजरी झाली. मात्र त्या गोष्टीचा राग मनात धरुन जातीयवादी लोकांनी अक्षय भालेराववर हल्ला केला. त्यामध्ये त्याची निर्घुण हत्या झाली.
दुसरी घटना ही हातगाव तालुक्यातील मौजे वाळकी (खु.) येथील आहे. येथील मातंग समाज गेले दोन वर्षांपासून आपले उध्दारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुन अभिवादन करीत असतात. या गावात बौध्द समाज राहत नसतानाही येथील मातंग समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी का करीत आहेत? हीच बाब येथील जातीयवादी लोकांना खटकत होती व अस्वस्थ करीत होती. या जातीयवादातून भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरुन रात्रीच्या वेळी लाईट्स बंद करुन सामुहीक जमावाने मातंग वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात मातंग समाजातील गायकवाड हा तरुण गंभीर झाला होता. सुदैवाने त्या हल्ल्यात कोणाची हत्या झाली नाही. तरी भविष्यात ही जातीयवादी मंडळी मातंगातील कोणीतरी स्वाभिमानी आंबेडकरी विचाराच्या तरुणाचा बळी घेतील, अशी शक्यता आहे. मौजे वाळके येथील ही जातीयवादी मंडळी सामुहीक हल्ला करुन न थांबता मातंग समाजातील १५ गुन्हे नोंदवीत जेलमध्ये टाकले आहे.
त्यामुळे राज्य शासनाने यावर आपल्या मागण्यांचा विचार करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. यात जरीन खानचा पोलीस कोठडीत खून करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर मनुष्य वधाचा ३०२ गुन्हा दाखल करुन संबंधित आरोपीला अटक करुन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. जरीन खानच्या कुटुंबियांना ५० लाखाचे आर्थिक सहाय्य करुन कुटुंबातील व्यक्तिला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे. मोहम्मद पैगंबर बील पारीत करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी व राज्यात वाढत असलेल्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वातावरणाला आळा घालावा.
अक्षय भालेराव याची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. मौजे वाळकी (खु.), ता. हातगांव, जि. नांदेड येथिल मातंग तरुणांवर नोंदविलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व तेथील समाजावर होणारा अन्याय दुर करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.