राजकोट किल्ल्यातील पुतळा दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मिलिंद माने
महाड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित जबाबदार दोन व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत. मात्र छत्रपती संभाजी राजे यांनी १२ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या पत्राची जर दखल घेतली असती तर आज ही वेळच आली नसती. हे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्रावरून स्पष्ट होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, तत्कालीन केंद्रीय मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन राज्यपाल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.

याबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर १२ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजे म्हणतात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास शंभर वर्षांपूर्वी देखील तयार केलेल्या अनेक पूर्णाकृती भव्य मूर्ती पाहावयास मिळतात. कित्येक मूर्ती या शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखल्या जातात महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या अनेक नामांकित शिल्पकारांनी आधुनिक साधनांची कमतरता असतानाही ही शिल्पे साकारली आहेत.
छत्रपती संभाजीराजे पुढे असे म्हणतात की, राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचे दिसून येत आहे. कित्येक आधुनिक साधने उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी व रेखीव दिसत नाही. अत्यंत कमी वेळात व घाईगडबडीत या शिल्पाचे काम केल्याचे दिसत आहे. मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येतात. मूर्तीचे हात, पाय व चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही. हेच शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी बसवलेले तात्पुरते शिल्प आहे व नंतर या ठिकाणी चांगले शिल्प बसवले जाणार आहे याचा उलगडा होत नाही असे स्पष्टपणे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
छत्रपती संभाजीराजे पुढे असे म्हणतात की, तरी शासनाच्या एखाद्या तज्ञ समितीने परिपूर्ण परिक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराजास साजेचे नवीन शिल्प या ठिकाणी लवकर प्रस्थापित करावे असे देखील लेखी पत्राद्वारे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने तसेच भारत सरकारने या पत्राची कोणती दखल न घेतल्याने राजकोट येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी दुर्घटना घडली. याला सर्वस्वी पंतप्रधान कार्यालय जबाबदार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी लोकसभा सदस्य विनायक राऊत यांनी देखील मालवण येथील राजकोट किल्ल्यात झालेल्या घटनेबाबत म्हटले आहे की, या दुर्घटनेत शिवरायांचा हवामान आज जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व इतर अधिकाऱ्यांवर पोलीस फौजदारी कारवाई करावी तसेच काही महिन्यापूर्वी नेव्ही डेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवरायांचे स्मारक भरताना ज्या प्रतिकात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, त्याकडे पूर्ण डोळे झाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर स्वतःचा टेंबा मिरवण्यासाठीच्या घाई गडबडीत निकृष्ट दर्जाचे काम करून शिवरायांचा पुतळा उभा केला गेला. करोडो रुपयांची उधळपट्टी शिवरायांच्या नावावर करून ज्यांनी स्वतःची तुंबडी भरली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुरावस्था झाली त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध पोलीस फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा तसेच नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येत आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान निसर्गनिर्मित किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितीच आहे. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पोलीस कारवाई करा आणि ज्येष्ठ तज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण केंद्रीय गृहमंत्री यांना द्यावेत अशी विनंती विनायक राऊत यांनी या पत्राद्वारे केली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने अंग झटकले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी २० ऑगस्ट २०२४ नौदलाचे कमांडर अभिषेक कारभारी यांना पाठवलेल्या लेखी पत्रात असे म्हटले आहे की, ४ डिसेंबर २०२३ रोजी सेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपल्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता. जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता, त्या नट बोल्टला आता पावसामुळे व समुद्रकिनाऱ्यावरील खारे वारे यामुळे गंज पकडला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रुप दिसत आहे. तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते. त्यामुळे पर्यटक स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी इत्यादींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कळविण्यात यावे असे स्पष्टपणे म्हटले होते.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत गंभीर घटना घडण्याचे संकेतच या माध्यमातून नौदलाच्या कमांडर अभिषेक कारभारी यांना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता कणकवली त्याचबरोबर तहसीलदार मालवण व पोलीस निरीक्षक मालवण यांना कळवले होते. हे कळून देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत कोणत्याही विभागाने गांभीर्याने दखल घेतली नाही हे यावरून स्पष्ट होत आहे. यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जबाबदारी झटकून टाकल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
पुतळा मंजूर करणाऱ्या एजन्सी व पुतळा . बसविणारे यांच्या हेतूविषयी शंका -इतिहासकार इंद्रजीत सावंत
राज्यातील इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी याबाबत म्हटले आहे की, छत्रपती शिवरायांनी खळाळत्या समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग साडे तीनशे वर्षानंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यांच्या चिरा न चिरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि हे गड किल्ले बांधणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत. पण आज सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवला गेलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा एक वर्षाच्या आतच धाराशाही झालेला आहे. हा पुतळा बसवला त्याच वेळी माझ्यासारख्या अभ्यासकाने या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल आणि त्याच्या मजबुतीबद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही याबद्दलही त्यावेळेला आम्ही पोस्ट लिहून लोकांसमोर आलेलो होतो. पण याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले.
त्यानंतर ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी मी या पुतळ्याला भेट दिली होती आणि त्यावेळीही हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही, हे शिल्प बदलावे असे निरीक्षण नोंदवले होते. खरंतर नौदलासारख्या प्रख्यात आस्थापनेने केलेले काम हे चिरंतन व्हायला पाहिजे होते. इतके ते मजबूत आणि सुंदर असायला हवं होतं. भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील तर ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल तर त्याच्या मजबुतीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही?
शिवछत्रपतींचे स्मारक हे काही गडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष झालं. आज संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचे शिवछत्रपतींचे स्मारक हे जमीनदोस्त झालेले पाहून भारताची, भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल याचा आपण विचार करावा आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेत असताना शिवाजी महाराजांचे भले उंच पुतळे तयार करून आणि ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील तर अशी स्मारके आपण उभी करावीत का? याचाही शिवप्रेमींनी विचार करावा. हा पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बसवणारे यांच्या हेतूविषयी आता आपल्याला शंका घेण्यास जागा आहे. ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार आहोत का? असा सवाल इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमध्ये केला आहे.
एकंदरीत राज्यामध्ये गोकुळाष्टमीच्या सणानंतर ते निवडणुकीच्या काळापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या दुर्घटनेबाबत आता सरकारला वारंवार धारेवर धरले जाणार असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.