सलीम शेख
माणगाव : गेले अनेक दिवस विकासाची स्वप्न पाहणाऱ्या रायगडसह नजीकच्या शहरातील नागरिकांना अंतराष्ट्रीय दिघी पोर्टकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर केंद्रांनी मंजुरी देत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिघी बंदराच्या विकासावर भर दिला. त्यामुळे रायगडसह मुंबई – पुणे शहराचा विकास अधिक गतिमान होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील दिघी बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार दिघी पोर्ट इंटस्ट्रीयल एरीया एकूण ६,०५६ एकर इतक्या क्षेत्रात विकसीत केले जाणार आहे. गुंतवणुक क्षमता ३८ हजार कोटींची राहाणार असून, या क्षेत्राच्या माध्यमातून १ लाख १४ हजार १८३ जणांना रोजगार अपेक्षित आहे. अशी माहिती आयएएस अधिकारी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्सा विभाग सचिव, अमरदीप सिंग भाटिया, आयएएस अधिकारी नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सीईओ आणि एमडी रजत कुमार सैनी, आयएएस अधिकारी महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक श्री. पी. डी. मलिकनेर, आयएएस अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संयुक्त मुख्य कार्यकार अधिकारी प्रशासन अनिल भंडारी यांनी विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली. त्यामुळे दिघीबंदरामुळे औद्योगिक क्षेत्राला आता चालना मिळणार आहे. यातून प्रचंड रोजगार निर्मिती होवून राज्यातील १२ शहरे औद्योगिक दृष्ट्या स्मार्ट होणार आहे. त्यामुळे दिघी बंदराच्या विकासामुळे मुंबई – पुणे रायगडचा विकास अधिक गतिमान होणार आहे.
यावेळी श्री. सिंग म्हणाले महाराष्ट्रातील औद्योगिक जोडणी परीक्षेत्र असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत दिघी पोर्ट इंटस्ट्रीयल एरीयाचा समावेश केलेला आहे. मुंबई शहरापासून दक्षिण दिशेला १७० किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर हे क्षेत्र वसलेले आहे. कोंकण रेल्वे मार्ग नजीक असल्याने या क्षेत्राला दळणवळणाच्या दृष्टीने दुहेरी लाभदायक ठरणार आहे. रायगड जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या ‘डीआयपीए’चे विकासाच्या दृष्टीने एकूण क्षेत्र ६०५६ एकर इतके निश्चित केले आहे. कोंकण रेल्वे सुविधेमुळे डेडिकेटेड फ्रेट कोरीडोर आणि जवाहरलाल नेहरु पोर्ट यांच्याशी जोडले जाण्याची दुहेरी संधी उपलब्ध आहे. या ठिकाणी ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, १ लाख १४ हजार १८३ जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, अन्न व प्रक्रिया उद्योग तसेच रासायनिक उद्योग, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्यांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. माणगाव तालुक्यातील बोंडशेत, कांदळगाव बु. निजामपूर, कुंभार्ते, कोशिंबळे तर्फे निजामपूर, जावठे तसेच रोहा तालुक्यातील पहूर, पाथरशेत, जामगाव या गावांसह अनेक गावांचा विकास होणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
भौगोलिक रचनेच्या दृष्टीने या क्षेत्राला दळणवळणाच्या व्यापक सुविधा उपलब्ध राहाणार आहेत. रस्ते मार्गाचा विचार केल्यास राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ माणगाव-पुणे तसेच राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई-गोवा महामार्ग हा या क्षेत्रापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. तर राज्य महामार्ग क्रमांक ९७ हा अवघ्या १ किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे मार्गाचा विचार केल्यास कोलाड या क्षेत्रापासून ५ किलोमीटर आणि इंदापुर व माणगाव अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असल्याने लोहमार्गाने प्रकल्प जोडला जाण्यास सुविधा होणार आहे. हवाई मार्गाचा विचार केल्यास या ठिकाणाहून मुंबई विमानतळ १७० किलोमीटर, सध्या विकसीत होत असलेला नवी मुंबई विमानतळ १२० किलोमीटर आणि पुणे विमानतळ ११६ किलोमीटर अंतरावर आहे. प्रकल्पांसाठी जलमार्गदेखील सुलभ असून, विविध बंदरे नजीकच आहेत. जेएनपीटी १०४ किलोमीटर, मुंबई पोर्ट १५३ किलोमीटर आणि दिघी पोर्ट ५५ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पांच्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यास बंदरांशी संलग्न औद्योगिकीकरण असल्याने त्याचा फायदा येथील कंपन्यांना होणार आहे. तसेच रोजगाराशी निगडीत मुंबई महानगरावर असलेला भार हलका होण्यास मदत होणार आहे. मुंबई, पुणे या दोन्ही शहरांशी उत्तम संपर्क असल्याने या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाची गती वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय इको टुरीझम व हेरीटेज टुरीझम या पर्यटन क्षेत्रांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.
दिघी बंदराच्या परिसरात मल्टी मॉडेल लॉजीस्टिक पार्क देखील विकसित करून रोजरागाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक जोडणी परीक्षेत्र असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत दिघी पोर्ट इंटस्ट्रीयल एरीयाचा समावेश होतो. मुंबई शहरापासून दक्षिण दिशेला १७० किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर हे क्षेत्र वसले आहे. यासह कोंकण रेल्वे मार्ग नजीक असल्याने या क्षेत्राला दळणवळणाच्या दृष्टीने दुहेरी लाभदायक ठरत आहे. रायगड जिल्ह्याअंतर्गत येणार्या ‘डीआयपीए’चे विकासाच्या दृष्टीने एकूण क्षेत्र ६०५६ एकर इतके निश्चित केलेले आहे. कोंकण रेल्वे सुविधेमुळे डेडिकेटेड फ्रेट कोरीडोर आणि जवाहरलाल नेहरु पोर्ट यांच्याशी जोडले जाण्याची दुहेरी संधी उपलब्ध आहे.