अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील रस्त्यांची व पुलांची दयनीय अवस्था असल्याचे वात्सव समोर येत असतानाच, त्यामध्ये आता कशेळे-खांडस, नांदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कशेळे-अकॅडमी जवळील व किकवी चिल्हार नदीवरील पुलाची व रस्त्याची दयनीय अवस्थेसंदर्भात काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील खड्डे भरून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, सदर पुलाची अवस्था ही ‘जैसे थे’ असून कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पुलावरून प्रवासादरम्यान अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न वाहनचालक व नागरिक यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. तर नागरी समस्या सोडविण्यास कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग हा सुस्त असल्याचे व आपघातामध्ये जीवितहानी होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

कशेळेपासून खांडस, नांदगाव भागात जाणारा रस्ता २५ हून अधिक गावे व आदिवासी वाड्या येथील नागरिकांचा मुख्य दळणवळणाचा मार्ग आहे. कशेळे, खांडस, किकवी येथील पुल असाच आहे. कशेळे ते खांडस गावाकडे जाणार्या १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर तसेच जोडरस्ता नांदगाव यावर शासनामार्फत लोकांच्या करप्राप्त पैशातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मागील पाच, सहा वर्षात सातत्याने साधारण १५ कोटीचा निधी खर्च केला आहे. तर यावर्षी कशेळे ते खांडस फाटापर्यंत रस्ते दुरुस्ती झाली आहे. या रस्त्यावरील अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स येथील चिल्हार नदीवरील वाहतुकीच्या दुष्टीने अत्यंत महत्वाचा असा किकवी येथील दुरावस्थेतील असलेल्या पुलाच्या डागडुजीच्या कामाकडे कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी एकदाही निधी खर्च केलेला नसल्याने व यावर्षी डांबरीकरण करण्यात आले असताना व करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या निकृष्ट कामाचे पितळ हे वरूणराजाने उघडे पाडले आहे. पुलावरील डांबर निघून गेल्याने पडलेले मोठमोठे खड्डे तसेच पुलाचा डांबराखालील भाग हा दिसू लागल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साठत असून या पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवणे कठीण होत आहे. रस्ता व पुलावरून जीव मुठीत घेऊन वाहनचालक व नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.

दरवर्षीच्या अर्थसंकल्पात कशेळे- खांडस व नांदगाव जोड रस्त्यावर शासनाकडून निधीची तरतूद केलेली जात असताना देखील कशेळे-खांडस व नांदगाव जोड रस्त्याची व जुन्या पुलांची दयनीय अवस्था का? असा नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सदर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हे आम्ही सूरू करून नागरिकांना होणारी गैरसोय दूर करू असे सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत येथील इंजिनियर अक्षय चौधरी यांनी बातमीदार यांना देण्यात आलेली प्रतिक्रिया या संदर्भात काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या बातम्यांची दखल घेत कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील खड्डे भरून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, सदर पुलाची अवस्था ही ‘जैसे थे’ असल्याने कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पुलावरून प्रवासादरम्यान अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न वाहनचालक व नागरिक यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. नागरी समस्या सोडविण्यास कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग हा सुस्त असल्याचे व अपघातामध्ये जीवितहानी होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.