मुंबई : उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीची बैठक निष्फळ ठरली. एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाही. ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, यासाठी सामंत यांनी विनंती केली. मात्र, जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर संपावर ठाम आहोत, असा पवित्रा एसटी कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. कृती समितीकडून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी उद्या (दि. ४) सह्यादी अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ४८ तास थांबायला हवे होते. गणेशोत्सवात संप करणे योग्य नाही. त्यामुळे गणेश भक्तांसाठी संप आज मागे घ्यायला हवा होता, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते आज (दि. ३) पत्रकारांशी बोलत होते. गणेश भक्तांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. ते पुढे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. संपाबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. नव्या एसटी गाड्यांबाबत बैठकीत चर्चा झाली. गणेश भक्तांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. त्याचबरोबर संपाला पाठिंबा दिलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
बुधवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समितीची बैठक होणार आहे. यावेळी विविध मागण्य़ांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
