किरण लाड
नागोठणे : जुन महिन्यात पावसाळा सुरु झाला कि, जंगलात, माळरानात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, आरोग्यासाठी लाभदायक अशा रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आषाढ महिना संपला कि, श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस, ऊन या स्वरुपाचे वातावरण निसर्गात निर्माण होते. याचवेळी माळरानात, जंगळात, डोंगरावर तसेच एका विशिष्ट ठिकाणी नैसर्गिकरित्या आढळणारी वनस्पती म्हणजे ‘अळंबी’. ही बाजारात आली कि, खवय्यांची खरेदीसाठी चढाओढ लागलेली असते. एवढी ही रुचकर,स्वादिष्ट असते.
‘अळंबी’ ही बुरशी गटातील वनस्पती आहे. या वनस्पतीला मशरुम देखील म्हणतात. जगात मशरुमच्या भरपूर जाती आहेत. पण भारतात बटन मशरुम, शिंपला मशरुम व धानपेंढ्यावरील चिनी मशरुम या जातीच्या मशरुमची लागवड केली जाते. जरी वरील मशरुमच्या जाती भारतात आढळत असल्या तरी श्रावण महिन्यात पावसाळ्यात नैसर्गिकरित्या आढळणारी ”अळंबी”ची चवच वेगळी असते. अळंबीचा पहिला बहर बाजारात येताच लोक विकत घेण्यासाठी तुटून पडतात. बाजारात विकायला आणलेली ‘अळंबी’ प्रचंड महाग असते, पण पैशाची पर्वा न करता खवय्ये ती घेण्यासाठी उत्सुक असतात. कारण तिची चवच अशी स्वादिष्ट, रुचकर असते कि, मटण, चिकन देखील तिच्यापुढे फिके पडते. मागील काही वर्षात दरी कपाऱ्यात राहणारे आदिवासी, ठाकुर समाज यांच्या उपजिविकेचे ते प्रमुख साधन बनले आहे.