विश्वास निकम
कोलाड : गणेश उत्सवाच्या अगोदरपासुन अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने भातशेतीत पाणीच पाणी झाल्याने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून येत आहे.
गेली पंधरा दिवसापासून पाऊस गायब झाला होता. यामुळे भातशेती करपू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, कोलाड परिसरात आज पावसाला जोरदार सुरुवात झाली. यामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळणार असल्यामुळे शेतकरी राजा सुखावला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरत जुन महिन्याच्या सुरुवातीला पहिल्याच आठवड्यापासून पावसाला चांगली सुरुवात झाली. यामुळे भात पेरणीची कामेही वेळेवर सुरु झाली. जुन महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाची रिपरिप सतत सुरु होती. यामुळे भाताची रोपेही उत्तम प्रकारे तयार झाली. जुलै महिन्यात तर पावसाने अती जोरदार सुरुवात केली. यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीला भात लावणीची सुरुवात झाली. पावसाची संततधार सुरुच राहिल्याने जुलै महिन्यात पंधरा ते वीस दिवसात लावणी पूर्ण झाली. परंतु लावणी पूर्ण झाल्यानंतर अति जोरदार पावसामुळे सर्व भातशेती तीन, चार दिवस पुराच्या पाण्यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेली. काही भातशेती वाहून गेली असल्याचे दिसून आले.
यानंतर भातशेतीने परत उभारी घेतली. भात फुलं घेत असतांना गेली पंधरा दिवसापासून पाऊस अचानक गायब झाल्यामुळे भातशेतीमध्ये पाण्याअभावी जमीन भेगाळली असल्यामुळे भातशेती धोक्यात आली होती. परंतु आज जोरदार पडलेल्या पावसामुळे भातशेती आता बहरेल अशी अशा शेतकरीच्या वर्गाला वाटू लागली असुन या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असल्याचे दिसून येत आहे.